ग्रामीण भागातील पाणी परीक्षण काळजीपूर्वक करा
पीडीओंना बैठकीत सूचना : तालुका पंचायतीतर्फे उपाययोजना, ग्रामीण पाणीपुरवठा मंडळातर्फे पाणी परीक्षण अभियान
बेळगाव : ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध आणि दर्जेदार पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी सर्व ग्रा. पं. पीडीओंनी पाणी परीक्षण काळजीपूर्वक करावे. अशा सूचना तालुका पंचायतमध्ये झालेल्या बैठकीत पीडीआंना (पंचायत विकास अधिकारी) करण्यात आल्या आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा मंडळातर्फे पाणी परीक्षण अभियान राबविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पीडीओंनीदेखील दर्जेदार पाणीपुरवठ्यासाठी काळजीपूर्वक लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागातील जनतेला कूपनलिका, विहिरी आणि जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान या पाण्यामध्ये क्षारता, नायट्रेट, फॉस्पेट यांचे प्रमाण किती आहे. याचे परीक्षण करून तातडीने अहवाल ग्रामीण पाणीपुरवठा मंडळाकडे सादर करावा. अशा सूचनाही पीडीओंना करण्यात आल्या. तालुक्यात 57 ग्रा. पं. आहेत. या सर्व ग्राम पंचायतमधील पीडीओंना आता पाणीपुरवठा परीक्षणासाठी अधिकवेळ द्यावा लागणार आहे.
जिल्हा पंचायत सीईओंनी मागील आठवड्यात बैठक घेऊन भित्तीपत्रकाद्वारे पाण्याविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर तालुका पंचायत आणि ग्रामीण पाणीपुरवठा मंडळाची मंगळवारी संयुक्त बैठक झाली. या बैठकीत तालुक्यातील सर्व पीडीओंना पाणी परीक्षण आणि इतर बाबींबाबत माहिती देण्यात आली. शिवाय ग्रामीण भागात पाण्याविषयी अधिक उपाययोजना राबविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. शहरासह ग्रामीण भागातही डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रो आदी रोगांचा फैलाव वाढू लागला आहे.
त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य खातेही खडबडून जागे झाले आहे. या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. ग्रामीण भागात दूषित पाण्याचा पुरवठा केला जातो. तर काही ठिकाणी पाण्यात क्षार आणि इतर घटक नसलेल्या पाण्याचाही पुरवठा होतो. त्यामुळे असे अपायकारक पाणी नागरिकांसाठी धोकादायक आहे. शुद्ध पाण्याबरोबर नागरिकांना दर्जेदार पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पीडीओंवर पाण्याच्या परीक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिवाय पीडीओंना तातडीने पाण्यासंबंधी अहवाल सादर करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांनी केल्या आहेत.