कॅनडाचे पंतप्रधान आजपासून भारत दौऱ्यावर
दौऱ्याच्या प्रारंभी मुंबईतील कार्यक्रमात सामील होणार : अनेक द्विपक्षीय करार होण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणावर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी भारत दौऱ्यावर येणार आहेत. कार्नी हे शुक्रवारपासून 2 मार्चपर्यंत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर असणार आहेत. कॅनडाचे पंतप्रधान कार्नी यांचा भारताचा हा पहिला अधिकृत दौरा असेल. कार्नी हे शुक्रवारी मुंबईत पोहोचून दोन दिवसांपर्यंत विविध व्यावसायिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणार आहेत. यादरम्यान ते भारतीय अन् कॅनेडियन सीईओ, उद्योगविषयक अन् आर्थिक तज्ञ, शिक्षक आणि कॅनेडियन पेन्शन फंडधारकांसोबत संवाद साधणार आहेत.
2 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मार्क कार्नी यांच्यासोबत दिल्लीतील हैदराबाद हाउसमध्ये शिष्टमंडळ स्तरीय चर्चा होणार आहे. दोन्ही नेते भारत-कॅनडा रणनीतिक भागीदारीच्या विविध क्षेत्रांमध्ये आतापर्यंत झालेल्या प्रगतीची समीक्षा करणार आहेत, ही समीक्षा कनानस्किस (जून 2025) आणि जोहान्सबर्ग (नोव्हेंबर 2025) मध्ये झालेल्या त्यांच्या मागील बैठकांवर आधारित असेल.
पंतप्रधान मोदी आणि कार्नी यांच्यात व्यापार आणि गुंतवणुकीवर चर्चा होणार आहे. याचबरोबर ऊर्जा, महत्त्वपूर्ण खनिजे, कृषी, शिक्षण, संशोधन, नवोन्मष आणि मानवीय संबंधांसह प्रमुख क्षेत्रांमध्ये सुरू असेलल्या सहकार्याचा आढावा घेतला जाणार आहे. दोन्ही नेते क्षेत्रीय आणि जागतिक घडामोडींवरही विचारविनिमय करतील. तसेच 2 जून रोजी आयोजित होणाऱ्या भारत-कॅनडा सीईओ फोरममध्ये दोन्ही नेते भाग घेणार असल्याचे विदेश मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
महत्त्वपूर्ण दौरा
पंतप्रधान मोदी आणि कार्नी यांच्यात होणारी चर्चा दोन्ही देशांदरम्यान भविष्योन्मुखी भागीदारीला पुढे नेण्याची संधी प्रदान करणार आहे. या दौऱ्याचा उद्देश मुख्यकरून द्विपक्षीय संबंधांना नवा वेग प्रदान करणे आहे. 2023 मध्ये कॅनडात खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येवरून झालेल्या राजनयिक वादानंतर दोन्ही देशांचे संबंध तणावपूर्ण झाले होते. दोन्ही देशांच्या संबंधांमधील तणाव हा मार्क कार्नी पंतप्रधान झाल्यापासून कमी होत आहे.
कॅनडात हिंसक गुन्ह्यांमध्ये भारत सामील नाही!
कॅनडात घडलेल्या हिंसक गुन्ह्यांमध्ये भारताचा हात नसल्याचे म्हणत तेथील सरकारने स्वत:च्या भूमिकेत मोठा बदल केला आहे. कॅनडाच्या भूमिकेतील हा बदल भारताकरता अत्यंत महत्त्वाचा आहे. कॅनडातील यापूर्वीच्या जस्टिन ट्रुडो सरकारने खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येमागे हात असल्याचा आरोप भारतावर केला होता. आता सुमारे 2 वर्षांपर्यंत तणावानंतर कॅनडाच्या मार्क कार्नी सरकारने संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न चालविला आहे. सुरक्षा धोक्यांना गांभीर्याने घेत असून ते दूर करण्यासाठी भारतासोबत काम करत असल्याचे कार्नी सरकारचे सांगणे आहे. कॅनडातील खलिस्तानी फुटिरवाद्यांवरून चिंता व्यक्त करत भारताने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वेळोवेळी केली आहे.