तळावडे रस्त्यावरील पुलाचा भाग वाहून गेल्याने बस बंद
वार्ताहर /कणकुंबी
कणकुंबी आणि परिसरात पावसाचा जोर अद्यापही कायम असून तळावडे ते गोल्याळी दरम्यान असलेल्या रस्त्यावरील एका नाल्यावरील पुलाचा कठडा आणि काही भाग मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने खानापूर आगाराची तळावडे बस बुधवारपासून बंद करण्यात आली आहे. तळावडे गावासाठी खानापूर आगाराची सकाळ आणि संध्याकाळ अशी बससेवा आहे. या बसमुळे तळावडे गावातील जवळपास 40 विद्यार्थी गोल्याळी हायस्कूलला येतात. परंतु बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे तळावडे, गोल्याळी दरम्यान असलेल्या एका नाल्यावरील पुलाचा काही भाग मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेला आहे.
त्यामध्ये रस्त्याचा जवळपास अर्धा भाग खचलेला असून मोठ्या वाहनांना धोका निर्माण झाला आहे.रस्त्याचा काही भाग वाहून आणि खचून गेल्याने तळावडे गावची बससेवा बुधवारपासून बंद करण्यात आली आहे. बससेवा बंद झाल्याने तळावडे ग्रामस्थ तसेच गोल्याळी येथील विश्व भारत सेवा समितीच्या हायस्कूलचे अध्यक्ष विजय नंदिहळ्ळी यांनी तळावडे बससेवा तातडीने पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. वाहून गेलेल्या भागात दगड माती घालून रस्ता दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले असून बससेवा पूर्ववत व्हावी यासाठी विजय नंदिहळ्ळी आणि तळावडे ग्रामस्थ शर्थीने प्रयत्न करत आहेत.
रस्ता दुरुस्तीस प्रारंभ
वास्तविक बांधकाम खाते रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेईपर्यंत पावसाळा निघून जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत बसअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तळावडे ग्रामस्थ व विश्व भारत सेवा समितीने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेतले आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांची बसअभावी गैरसोय होऊ नये. तसेच गोल्याळी हायस्कूलला चालत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कोसळलेल्या पुलाची दुरुस्ती करण्यात येत आहे.