भारत-बांगलादेश दरम्यान बससेवा पुन्हा सुरू
तारिक रहमान यांनी पालटला युनूस यांचा आणखी एक निर्णय
वृत्तसंस्था/ अगरतळा
भारत आणि बांगलादेशदरम्यान पुन्हा एकदा बससुविधा सुरू झाली आहे. सुमारे 18 महिन्यांनी अगरतळा-ढाका-कोलकाता आणि कोलकाता-ढाका-अगरतळा मार्गावर इंटरनॅशनल मैत्री बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान सीमापार संपर्कव्यवस्था पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.
बस सुविधा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी मैत्री बस कोलकात्याहून निघाली आणि ढाका येथे जात अगरतळामधील अखौरा इंटीग्रेटेड चेकपोस्टवर पोहोचली. तारिक रहमान हे बांगलादेशचे पंतप्रधान झाल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध सातत्याने सुधारत असून मागील आठवड्यातच दोन्ही देशांदरम्यान व्हिसा सेवा पुन्हा सुरू झाली होती.
बससेवा पुन्हा सुरू होणे दोन्ही देशांदरम्यान सुधारणाऱ्या संबंधांचे उदाहरण आहे. बससेवा पुन्हा सुरू झाल्याने दोन्ही शेजारी देशांदरम्यान पर्यटन, व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला नवा वेग मिळणार आहे. प्रभावी सुरक्षा आणि सहज संभाषणामुळे लोकांदरम्यान संबंध अधिक दृढ होतील असे त्रिपुराचे पर्यटन मंत्री सुशांत चौधरी यांनी म्हटले आहे. पर्यटनमंत्र्यांनी उत्तम क्षेत्रीय संपर्कव्यवस्थेच्या महत्त्वावरही जोर दिला . रेल्वेसंपर्कासोबत इंटीग्रेशन अन् सबरुममध्ये मैत्री ब्रिजचा प्रभावी वापर, तसेच बंदरापर्यंत प्रभावी पोहोचमुळे ईशान्येच्या अर्थव्यवस्थेला मोठा लाभ होणार आहे आणि व्यापार क्षमतांना प्रोत्साहन मिळेल असे वक्तव्य चौधरी यांनी काढले आहेत. बससेवेच्या पहिल्या दिवशी कोलकात्याहून 18 जणांनी बसमधून प्रवास केला आहे.
दोन्ही देशांदरम्यान जवळपास दीड वर्षांपूर्वी बससेवा स्थगित करण्यात आली होती. बांगलादेशचे तत्कालीन अंतरिम सल्लागार मोहम्मद युनूस यांनी बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ही बससेवा पुन्हा सुरू झाल्याने या क्षेत्रात आर्थिक घडामोडींना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अगरतळा-ढाका बससेवा पुन्हा नियमित स्वरुपात चालविली जाणार असल्याने दोन्ही देशांदरम्यान आंतरराष्ट्रीय संपर्कव्यवस्था आणखी मजबूत होणार आहे. मैत्री बससेवा पुन्हा सुरू होण्याच्या घटनेला एक सकारात्मक घडामोड मानले जात असून ती भारत आणि बांगलादेशदरम्यान संपर्क, व्यापार आणि मैत्रिपूर्ण संबंधांना मजबूत करणार आहे.