For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरोपी विद्यार्थ्याच्या घरावर बुलडोझर

06:45 AM Aug 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
आरोपी विद्यार्थ्याच्या घरावर बुलडोझर
Advertisement

उदयपूरमधील चाकूहल्ल्याच्या घटनेत प्रशासनाची मोठी कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ उदयपूर

राजस्थानमधील उदयपूरमध्ये शुक्रवारी एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केला. यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी शनिवारी उदयपूर महामंडळाने आरोपी विद्यार्थ्याच्या घरावरील बेकायदा बांधकाम बुलडोझरच्या सहाय्याने पाडले. याप्रसंगी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर नजर ठेवली जात आहे.

Advertisement

उदयपूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादातून चाकूहल्ला झाल्याची घटना घडली आहे. प्रशासन आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे उदयपूर शहरात परिस्थिती सामान्य होत आहे. याचदरम्यान मनपाच्या दोन जेसीबींद्वारे शनिवारी सकाळी घर जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यात आली. सर्वप्रथम आरोपी पक्षाच्या घराची वीज जोडणी तोडण्यात आली. त्यानंतर जेसीबीने बेकायदा बांधकाम पाडले. त्यापूर्वी महामंडळाचे पथक मोठ्या पोलीस बंदोबस्तात दिवाण शहा कॉलनीत पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, हे घर वनजमिनीवर बांधल्याचे प्रशासकीय नोंदीनुसार स्पष्ट झाले आहे.

उदयपूरमध्ये झालेल्या चाकूहल्ल्याच्या घटनेनंतर वातावरण बिघडल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. उदयपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात सर्व सरकारी आणि खासगी शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. भारतीय नागरी संरक्षण संहिता 2023 चे कलम 163 (सीआरपीसीचे कलम 144) शहरात लागू करण्यात आले आहे.

जखमी विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार

उदयपूरमध्ये शालेय विद्यार्थ्यावर झालेल्या चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर ऊग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर ऊग्णालयाच्या इमर्जन्सी युनिटबाहेर मोठ्या संख्येने लोक जमले होते. याप्रसंगी लोकांनी हनुमान चालिसाचे पठण करत जखमी विद्यार्थ्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली.

शहरातील जनजीवन सामान्य

शनिवारी सकाळपासून शहरातील जनजीवन सुरळीत असून, सर्वच मार्गांवर बिनदिक्कत वाहतूक सुरू आहे. विभागीय आयुक्त, आयजी, जिल्हाधिकारी, एसपी यांच्यासह सर्व अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शांतता आणि सलोखा राखण्यासाठी 26 कार्यकारी दंडाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हा दंडाधिकारी अरविंद पोसवाल यांनी कलम 163 अन्वये मनाई आदेश लागू केले. इंटरनेट सेवा निलंबित केल्याने अफवा आणि चुकीच्या माहितीचा प्रसार रोखला गेला. उदयपूरमधील इंटरनेट सेवा 24 तासांसाठी बंद करण्यात आली आहे. याशिवाय पोलिसांनाही अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे.

अतिरिक्त फौजफाटा दाखल

दरम्यान, उदयपूर पोलीस अधीक्षकांनी कोणत्याही परिस्थितीत शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय उपद्रव पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे आदेश जारी केले. पोलीस मुख्यालयाने तात्काळ प्रभावाने पाच आरएसी कंपन्यांची फौज उदयपूरला पुरवली आहे. याशिवाय शेजारील जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, निरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने हवालदारही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जयपूरमधील डझनहून अधिक पोलीस कंपन्या उदयपूरमध्ये पोहोचल्या असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Advertisement
Tags :

.