तिरोडा येथील बीएसएनएल टॉवर तात्काळ सुरु करण्यात यावा
सागर नाणोसकर यांची मागणी , अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
न्हावेली / वार्ताहर
तिरोडा येथे सुमारे पाच वर्षापूर्वी मंजूर झालेला बीएसएनएलचा मोबाईल टॉवर प्रशासकीय उदासीनमुळे अद्यापही बंद अवस्थेत आहे. हा टॉवर उभारून दहा महिने उलटले तरी तो कार्यान्वित न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.या पार्श्वभूमीवर युवासेना उपजिल्हाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य सागर नाणोसकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून येत्या आठ दिवसात टॉवर सुरु न झाल्यास प्रजासत्ताकदिनी टॉवरवर चढून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,तिरोडा गावातील रेंजची समस्या सोडविण्यासाठी पाच वर्षापूर्वी हा टॉवर मंजूर करण्यात आला होता.ग्रामस्थांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन दहा महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष टॉवर उभारण्याचे काम पूर्ण झाले.मात्र,काम पूर्ण होऊनही तांत्रिक कारणांचे नाव पुढे करत प्रशासनाने हा टॉवर अद्याप सुरु केलेला नाही.याचा फटका केवळ तिरोडाच नव्हे तर शेजारील नाणोस आणि गुळदुवे येथील नागरिकांनाही बसत असून मोबाईल रेंजअभावी त्यांची मोठी गैरसोय होत आहे.श्री नाणोसकर यांनी बीएसएनएलच्या उप महाव्यवस्थापकांना आज लेखी निवेदन सादर केले.या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की,टॉवर सुरु करण्यासाठी ग्रामस्थांनी नेहमीच प्रशासनाला सहकार्य केले आहे.मात्र संबंधित अधिकारी या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून केवळ वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या संयमाचा अंत झाला आहे.प्रशासनाला दिलेल्या आठ दिवसाच्या मुदतीत तोडगा न निघाल्यास २६ जानेवारी रोजी टॉवरवर चढून आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.