नंदगड डॅमचे दोन्ही कालव्यांचे दरवाजे नादुरुस्त
पावसाळा सुरू होण्यापूर्वी डॅमची दुरुस्ती होणे गरजेचे
खानापूर : नंदगड गावाजवळ असलेल्या डॅमच्या उजव्या व डाव्या कालव्याचे दरवाजे पूर्णपणे नादुरस्त झाले असून दरवाजे ऑपरेट करण्यासाठी बांधण्यात आलेले स्लॅब कोसळलेले आहे. त्यामुळे पाण्याची गळती होऊन पाणी जात असल्याने डॅममध्ये पूर्ण क्षमतेने पाण्याची साठवणूक होत नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. दोन्ही कालव्यांच्या दरवाज्याची दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे आहे. अन्यथा पावसाळ्यात डॅममध्ये पाणी साठवणूक योग्य क्षमतेने होणार नाही. यासाठी लघुपाटबंधारे खात्याने पावसाळ्यापूर्वी दोन्ही कालव्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. नंदगड परिसरातील दुर्गादेवी डोंगराच्या खाली नैसर्गिक परिस्थितीचा विचार करून या ठिकाणी शेतीसाठी तत्कालीन आमदार बसाप्पण्णा अरगांवी यांनी हा डॅम उभारण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नातून हा डॅम तयार झाला होता. या डॅमच्या माध्यमातून शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी उजवा, डावा दोन कालवे करण्यात आले होते. दोन्ही कालव्यांद्वारे चार कि. मी. परिसरातील शेतीला पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे कसबा नंदगड, चन्नेवाडी, सागरे, नजिनकोंडल, भुत्तेवाडी आदी परिसरातील 1500 एकर शेतीसाठी उपयुक्त आहे. मात्र अलीकडे दोन्ही कालव्यांचे दरवाजे पूर्णपणे निकामी झाले असून एका उजव्या कालव्याचा दरवाजा ऑपरेटींगसाठी तयार केलेली सीडी कोसळली असून त्यामुळे कालव्याच्या ऑपरेटींगसाठी जाता येत नाही. दोन्ही कालव्यांचे दरवाजे पूर्णपणे निकामी झाले आहेत.
मंजुरी दिल्यास कालव्यांची दुरुस्ती करू!- लघुपाटबंधारे विभाग
याबाबत लघुपाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, दोन्ही कालव्यांच्या दुरुस्तीसाठी तसेच सीडीच्या कामासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे. जर शासनाने प्रस्तावास मंजुरी दिल्यास दोन्ही कालव्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, तसेच गाळ काढण्यासंदर्भात ग्रा. पं. ने ठराव करून आम्हास पत्र दिल्यास ताबडतोब परवानगी देण्यात येईल, मात्र ग्राम पंचायतीने याबाबत पुढाकार घेणे गरजेचे आहे.