पुस्तक महोत्सवामुळे युवा वाचक घडेल
साबांखामंत्री दिगंबर कामत यांचा आशावाद, वाचनसंस्कृतीच्या आठवणींना दिला उजाळा, गोव्यातील साहित्यिकांचा सन्मान सोहळा
पणजी : राष्ट्रीय बुक ट्रस्ट ऑफ इंडिया (एनबीटी) आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशनतर्फे राज्यात प्रथमच होत असलेला गोवा पुस्तक महोत्सव हा युवा वाचकवर्ग तयार करण्याच्यादृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. असे महोत्सव झाले तरच नवा वाचकवर्ग तयार होईल, असे स्पष्ट मत सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी व्यक्त केले. कांपाल मैदानावर राष्ट्रीय एनबीटी आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशनतर्फे आयोजित गोवा पुस्तक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘लेखकांचों भौमान सुवाळों’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून दिगंबर कामत बोलत होते. यावेळी एनबीटीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, लोकमान्य कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर उपस्थित होते.
दिगंबर कामत म्हणाले, विविध विषयांवरील पुस्तके वाचनाची आवड आपल्यामध्ये लहानपणापासूनच आहे. त्यामुळे मडगाव येथील भाटीकल हायस्कूलमध्ये त्याकाळी अन्य विद्यार्थ्यांच्या साथीने सुरु केलेल्या ग्रंथालयाला मी आजही भेट देतो. वाचन हा संस्कृतीचा पाया असल्याने ही संस्कृती वाढण्याची गरज आहे. वाचनाने जीवन समृद्ध होते. त्यामुळे असे महोत्सव यापुढेही कायमस्वऊपी व्हायला हवेत, असेही कामत म्हणाले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मंत्री दिगंबर कामत, खास बेळगावहून आलेले डॉ. विनोद गायकवाड, तसेच सूत्रसंचालिका सिद्धी उपाध्ये तसेच अनेक साहित्यिकांचा डॉ. किरण ठाकुर आणि मिलिंद मराठे यांच्या हस्ते श्रीफळ, शाल, प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
प्रत्येक भाषेत असते माधुर्य : प्रा. मराठे
मिलिंद मराठे म्हणाले, गोव्यात पुस्तक महोत्सव व्हावा यासाठी आम्हाला डॉ. किरण ठाकुर यांनी ही संधी उपलब्ध करुन दिली. भाषा ही एकमेकांना जोडण्याचे साधन आहे. प्रत्येक भाषेत माधुर्य असते. कोणतीच भाषा वाईट वाईट नसते. ती शिकण्याची, शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकांकडून व्हायला हवा. देशातील तमाम साहित्यिकांनी भाषेच्या संवर्धनाची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामध्ये गोव्यातील साहित्यिकही पाठीमागे नसल्याचेही मराठे यांनी सांगितले.
गौरविण्यात आलेले साहित्यिक सन्मानमूर्ती
साहित्यिक डॉ. जयंती नाईक, देविदास कदम, नीलबा खांडेकर, एन. शिवदास, अशोक कामत, माया खरंगटे, परेश कामत, डॉ. प्रकाश पर्येकर, उदय भेंब्रे, डॉ. किरण बुडकुले, डॉ. प्रकाश वजरीकर, तुकाराम शेट, रमेश घाडी, नयना आडारकर, नूतन साखरदांडे, ग्वादालूप डायस यांचा साहित्यातील भरीव योगदानाबद्दल डॉ. किरण ठाकुर, मिलिंद मराठे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रशिस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
शालेय जीवनातच ग्रंथालय केले सुरु : कामत
वाचनाच्या आवडीमुळे अन्य विद्यार्थी सहकाऱ्यांसमवेत मी लहानपणीच शाळेत ग्रंथालय सुरु करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या ग्रंथालयातील पुस्तके वाचनासाठी देताना दोन ऊपये, पाच ऊपये ग्रंथालयात ठेवून घेतले जात होते. ज्यावेळी वाचक पुस्तक परत करेल, त्यावेळी हे दोन ऊपये, पाच ऊपये परत केले जायचे. शालेय जीवनात सुरु केलेल्या ग्रंथालयाला आजही मी भेट देतो. या ग्रंथालयात ज्येष्ठ नागरिक व इतर वाचक पुस्तकांबरोबरच दैनिकांचेही वाचन करताना मनाला खूप समाधान वाटते, असे दिगंबर कामत यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले.
भाषेच्या संवाहार्दाची भूमिका यशस्वीपणे पेलली : डॉ. ठाकुर
किरण ठाकुर म्हणाले, वाचक, साहित्यिकांमध्ये तसेच लोकांमध्ये वाचनाची आवड वाढीस लागावी, यासाठी आम्ही आग्रही भूमिका घेतली. आज गोव्यात गोवा पुस्तक महोत्सव करण्यामागील मुख्य उद्देश्य हा राज्यातील व वाचनसंस्कृती मजबूत करण्याचा आहे. वाचनसंस्कृती मजबूत व्हावी, हीच इच्छा असल्याने या महोत्सवात वाचक, लेखक, साहित्यिक, कवी, विद्यार्थी यांना एकत्र जोडण्याचे काम केल्याचे समाधान वाटते. वाचनाची आवड करण्याबरोबरच भाषेच्या संवाहार्दाची भूमिकाही आम्ही यशस्वीपणे पेललेली आहे. यापुढेही भाषेच्या संवाहार्दाचे कार्य आमच्याकडून सुरु राहील, असेही डॉ. ठाकुर म्हणाले.