For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2.5 कोटी लोकांना भाजप घडविणार रामलल्लाचे दर्शन

06:42 AM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
2 5 कोटी लोकांना भाजप घडविणार रामलल्लाचे दर्शन
Advertisement

लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघातून 5 हजार लोकांना अयोध्यावारी घडविणार : आमदारांना सोपविली जबाबदारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अयोध्येतील रामजन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर भाजप देशभरातील लोकांना अयोध्येचे दर्शन घडविणार आहे. 543 लोकसभा मतदारसंघ आणि सर्व विधानसभा मतदारसंघांमधील सुमारे 2.5 कोटी लोकांची अयोध्यवारी घडविण्याचे उद्दिष्ट भाजपने निश्चित केले आहे.

Advertisement

या अयोध्यावारीदरम्यान भाजपने राममंदिराची लढाई कशाप्रकारे लढविली हे लोकांना सांगण्यात येणार आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून प्रत्येकी 5 हजार तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी 2 हजार लोकांना अयोध्येत आणण्याचे लक्ष्य आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपचा एकही खासदार किंवा आमदार नसलेल्या ठिकाणी पक्षप्रतिनिधी प्रत्येकी 2 हजार लोकांची व्यवस्था करणार आहे. सुमारे 3 महिन्यांमध्ये 1 कोटी लोकांना दर्शन आणि पूजेची संधी दिली जाणार आहे. उर्वरित 1.5 कोटी लोकांना पुढील महिन्यांमध्ये दर्शनासाठी अयोध्येत नेले जाणार आहे.

अयोध्यावारीसाठी लोकांची निवड वर्तमान खासदार आणि आमदारांनी करावी असा निर्णय पक्षाने घेतला आहे. 23 जानेवारीनंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी प्रत्येक 5 हजार लोकांचा समूह अयोध्येत आणला जाणार आहे. दूरवरून येणाऱ्या भाविकांना रेल्वेद्वारे अयोध्येत आणले जाईल. खासदार आणि आमदार हेच या भाविकांच्या प्रवासाची, वास्तव्याची आणि जेवणाचा खर्च उचलणार असल्याचे समजते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर म्हणजेच 22 जानेवारीनंतर देशभरातील विविध राज्यांमधून अयोध्येसाठी सुमारे 120 विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

500 वर्षांत जे घडू शकले नाही ते भाजपने करून दाखविले असा संदेश देण्याचा यामागे प्रयत्न आहे. जेव्हा हेच स्वत:च्या भागात परतल्यावर अयोध्या, रामंदिराचा विकास आणि त्यासंबंधीचे प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचवतील, यातून भाजपला राजकीय लाभ होणार असल्याचे मानले जात आहे.

देशातील सर्व हिंदूधर्मीयांना राम नावाच्या धाग्याची जोडण्याची तयारी याच्या माध्यमातून भाजप करू पाहत असल्याचे मानले जात आहे. निवडलेल्या लोकांची अंतिम यादी 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करायची आहे. याकरता लोकांशी संपर्क सुरु झाला आहे. त्याचबरोबर यासंबंधी माहिती अयोध्या प्रशासन आणि रामजन्मभूमी ट्रस्टला पाठविण्यात आली आहे. या भाविकांच्या वास्तव्य आणि भोजनाची व्यवस्था अयोध्येत करण्यास ट्रस्टची मदत होऊ शकते.

Advertisement

.