भाजप-निजदने उज्ज्वल योजनेच्या बदल्यात प्रज्ज्वल योजना लॉन्च केली!
अंजली निंबाळकर यांचा कारवार तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रचार
खानापूर : देशात उज्ज्वल योजना पूर्णपणे अयशस्वी ठरली आहे. मात्र कर्नाटकात निजद आणि भाजपच्या युतीने महिलांवरील अत्याचाऱ्यात आघाडीवर असणाऱ्या प्रज्ज्वल रेवण्णा या गुन्हेगारी वृत्तीच्या माणसाला लॉन्च करून त्याचा प्रचार खुद्द प्रधानमंत्रींनी केला आहे. प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या कारणाम्याची संपूर्ण माहिती पंतप्रधानांना असूनदेखील त्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांचा प्रचार केला. यावरुनच भाजपची नितीमत्ता कळून येते, असे वक्तव्य कारवार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांनी कारवार तालुक्यातील मुदगा, अहमदहळळी, बिनगा, नंदनगद्दा, कोडीबाग या भागात प्रचार करताना केला. त्या पुढे म्हणाल्या, भाजप हा भांडवलदारांचा पक्ष असून त्यांना देशातील गोरगरीब जनतेची परवा नाही, फक्त उद्योगपतींचे कसे भले होईल, याचाच विचार भाजप करत असते. शेतकऱ्यांच्या जमिनी, देशाची संपत्ती, उद्योगपतींच्या ताब्यात कसे राहील, हेच भाजप करत आहे. शेतकऱ्यांच्या अतिक्रमण जमिनी पुन्हा मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
राज्य प्रशासकीय आयोगाचे अध्यक्ष आमदार आर. व्ही. देशपांडे म्हणाले, दहा वर्षात भाजपच्या काळात देशात गरिबी वाढली. महागाईने तर कळस गाठला आहे. सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मोदी सरकार असमर्थ ठरले आहे. खोट्या प्रचाराच्या आधारे लोकांची दिशाभूल करून लोकांचे धृविकरण करण्याचे काम भाजपने सुरू केले आहे. देशात गेल्या दहा वर्षात सामाजिक वातावरण पूर्णपणे बिघडून गेले आहे. देशातील सामाजिक सलोखा आणि सौहार्द काँग्रेसच निर्माण करू शकते. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी काँग्रेस सक्षम असल्याने कारवार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांना प्रचंड मताने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. सुरुवातीला निंबाळकर यांच्यासह जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य, माजी मंत्री रामनाथ रै, आमदार सतिश सैल, जिल्हाध्यक्ष साई गावकर यांनी नागनाथ मंदिरात जावून दर्शन घेतले. तसेच बिनगा येथील चर्चमध्ये जावून प्रार्थना केली.