हिंसा पीडितांची भाजप नेत्यांनी घेतली भेट
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसा
वृत्तसंस्था/ कोलकाता
लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय पथक राज्यात पोहोचले आहे. बंगालमधील आमदार अग्निमित्रा पॉल, माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार रविशंकर प्रसाद आणि त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री तसेच खासदार विप्लव कुमार देव यांनी दक्षिण 24 परगणा येथे झालेल्या हिंसेच्या पीडितांची भेट घेत त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आहेत.
दक्षिण 24 परगणा येथे हिंसा झाली असून भाजप कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. हिंसेमुळे गावातील सर्व लोकांनी पलायन केले आहे. ममता बॅनर्जींच्या राज्यात लोक असुरक्षित असल्याची टीका भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केली आहे.
बंगालमध्ये प्रत्येक ठिकाणी एकच कहाणी आहे. भाजपसाठी काम केला तर मार खावा लागेल अशी धमकी दिली जात आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या पत्नी आणि आईवडिलांना हिंसेला तोंड द्यावे लागत आहे. ममता बॅनर्जींचे सरकार असताना राज्यात महिलांना मारहाण केली जात आहे. हा अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचे उद्गार रविशंकर प्रसाद यांनी काढले आहेत.
आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वांसमोर स्वत:ची व्यथा मांडली आहे. अशा स्थितीत पोलिसांनी त्यांच्याविरोधात खोटा गुन्हा नोंदविला तर आम्ही मोठे आंदोलन करू. आम्ही राष्ट्रीय स्तरावर हा विषय लावून धरणार आहोत असे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.
ममता बॅनर्जी यांनी कम्युनिस्टांचे 34 वर्षांचे शासन संपुष्टात आणले, परंतु त्यानंतर त्यांनी काय केले? कम्युनिस्टांनी जे केले नाही ते ममतांनी केले आहे. ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या भूमीत हिंसा घडवून आणणाऱ्यांना थारा दिला असल्याचा आरोप विप्लव कुमार देव यांनी केला आहे.