भाजपने देशात फैलावला द्वेष : राहुल गांधी
झारखंडच्या खुंटीमध्ये सभेला केले संबोधित
वृत्तसंस्था/ खुंटी
लोकसभा निवडणुकीला आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशा स्थितीत काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रा काढत आहेत. राहुल गांधी यांची ही यात्रा मंगळवारी झारखंडच्या खुंटी येथे पोहोचली, तेथे त्यांनी लोकांना संबोधित केले आहे. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी भाजप तसेच संघाने देशात द्वेष आणि हिंसा फैलावल्याचा आरोप केला आहे. देशातील द्वेषाचे वातावरण पाहता मी जनतेदरम्यान येण्याचा, एकजूट होण्याच आणि जनतेच्या मुद्द्यांना संबोधित करण्याचा विचार केला. भारत जोडो न्याय यात्रेचे उद्दिष्ट हेच असल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील ही यात्रा मंगळवारी ओडिशात दाखल झाली आहे. ही यात्रा झारखंडमधून ओडिशाच्या सुंदरगढ जिल्ह्यातील बीरमित्रपूरमार्गे राज्यात दाखल झाली. या शहरात सर्वत्र राहुल गांधींचे बॅनर, कटआउट आणि पोस्टर्स दिसून आली आहेत.
बीरमित्रपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजप आमदार करत आहे. परंतु यापूर्वी या मतदारसंघात काँग्रेस आणि झामुमोचे उमेदवार विजयी झाले होते. राहुल गांधी यांचे बीरमित्रपूर येथे स्थानिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे.
राहुल गांधी हे बुधवारी राउरकेला ते पानपोश चौकापर्यंत 3.4 किलोमीटर लांब पदयात्रा करणार आहेत. तेथे ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. तसेच सुंदरगढ शहरात देखील राहुल गांधी पदयात्रा करणार असून त्यानंतर एका जाहीर सभेला संबोधित करतील. तर झारसुगुडा येथील अमलीपाला मैदानात रात्री वास्तव्य करणार आहेत.
8 फेब्रुवारी रोजी झारसुगुडा येथून राहुल गांधी यांची यात्रा पुन्हा सुरू होणार असून यानंतर ते एका सभेला संबोधित करणार आहेत. मग त्याच दिवशी त्यांची ही यात्रा छत्तीसगडमध्ये पोहोचणार आहे. ओडिशात सुंदरगढ आणि झारसुगुडामध्ये यात्रेच्या अंतर्गत सुमारे 200 किलोमीटर अंतराचा प्रवास राहुल गांधी करणार आहेत.