भंडारी समाजाची मागणी भाजपने केली मान्य : मुख्यमंत्री
पणजी : केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्यामुळे याच विषयासंबंधी भंडारी समाजाने आजपर्यंत लावून धरलेली मागणीही मान्य झाली आहे, असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले आहे. गुऊवारी पणजीत एका कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी केंद्र सरकारने घेतलेल्या जातनिहाय जनगणनेच्या ऐतिहासिक निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. देशाच्या सामाजिक आणि आर्थिक सुधारणा राबविण्यासाठी हा निर्णय मोलाचा ठरेल, असेही ते म्हणाले. असा ऐतिहासिक निर्णय यापूर्वी कोणत्याही सरकारने घेतला नव्हता. ते काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने करून दाखवले आहे. गोव्यात प्रदीर्घ काळापासून भंडारी समाजाकडून जातनिहाय जनगणनेची मागणी होत होती. मात्र जनगणना हा विषय केंद्राच्या अखत्यारित येत असल्याने तो केंद्रीय पातळीवरच सोडविण्यात येईल, असे आश्वासन हल्लीच मुख्यमंत्र्यांनी भंडारी समाजातील नेत्यांना दिले होते.