शेतीवर आधारित अर्थव्यवस्था भाजपने मोडकळीस आणली
उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रभारसभेत धर्मराज गौडर यांची टीका
वार्ताहर /काकती
मोदींच्या भाजपा सरकारात शेतीमालाला मिळणारी कवडीमोल किंमत फक्त शेतकऱ्यांवरील कर्ज वाढविण्याचे काम करत आहे. शेतमालाचे भाव बाजारात गडगडत असले, तरी शेतकऱ्यांच्या दुखण्याला सरकारचीही साथ मिळत नाही. यामुळे शेतकऱ्याला आपला संसार आर्थिक हालअपेष्टेत घालवावा लागत आहे, अशी खंत नेगिलयोगी सुरक्षा रयत संघाचे राजाध्यक्ष धर्मराज गौडर यांनी चिकोडी लोकसभेच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रभारसभेत व्यक्त केली. काकती येथे रयत संघाच्या वतीने काँग्रेसचा प्रचार करून होळी चौक येथे झालेल्या प्रचारसभेत धर्मराज गौडर शेतकऱ्यांना उद्देशून पुढे म्हणाले, देशातील सर्वाधिक जनता ज्या शेतीवर अवलंबून आहे. शेतीवर आधारित अर्थव्यवस्था भाजपने मोडकळीस आणली आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेस पैसे खर्च करावे लागतात. गुंतवणूक करावी लागते. परंतु मिळालेल्या उत्पन्नात त्याला चार पैसे शिल्लक राहतील याची शाश्वती नाही. परिणामी देशात शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत चालली आहे. पालेभाज्यांची धोरणे शेतकरी बांधवाला देशोधडीला लावीत आहेत. याउलट स्वातंत्र्याच्या सात दशकात काँग्रेस पक्षाने हरितक्रांती, श्वेतक्रांती घडविली. काँग्रेस सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीची कायदेशीर हमी देणार आहे. या निर्णयामुळे देशातील सुमारे 15 कोटी शेतकरी कुटुंबांना यांचा फायदा होणार आहे, असे पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी जाहीर केले आहे. यासाठी उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन गौडर यांनी केले. यावेळी रयत संघटनेचे पदाधिकारी माऊती नरेगवी, बसवंत कुंभार, सुनील मोळेराखी, सिद्राई टुमरी, अप्पी बाजरेकर, कलाप्पा मोळेराखी, शंकर बसरीकट्टी व शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.