राज्यातील पाकिस्तानी नागरिकांच्या वास्तव्याबाबत भाजप आक्रमक
राणी चन्नम्मा चौक येथे निदर्शने : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : राज्यात अनेक पाकिस्तानी नागरिक बेकायदेशीररित्या वास्तव्यास आहेत. यामुळे देशाच्या संरक्षणाला धोका निर्माण झाला आहे. देशातील पाकिस्तानी नागरिकांना पुन्हा माघारी धाडण्याचे निर्देष केंद्र सरकारने देऊन देखील राज्य सरकार याकडे लक्ष देत नसल्याच्या विरोधात मंगळवारी भाजपच्यावतीने निदर्शने करण्यात आली. राणी चन्नम्मा चौक येथे आंदोलन करत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
देशात बेकायदेशीररित्या अनेक पाकिस्तानी नागरिकांनी घुसखोरी केली आहे. कर्नाटकातही अनेक पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचे सिद्ध झाले आहे. अनेक देशविघातक कारवायांमध्ये याचा सहभाग असतो. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व पाकिस्तानी नागरिकांना माघारी पाठविण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून याबाबतचे आदेश राज्य सरकारांना देण्यात आले आहेत. असे असतानाही राज्यातील भाजप सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माजी आमदार संजय पाटील यांनी केला.
देशांवर कोणतेही संकट आल्यास एकजुटीने लढण्याची देशाची परंपरा आहे. मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या तुष्टीकरणाचे राजकारण करीत आहेत. राज्य सरकारने राजकारण बाजुला ठेवत जबाबदारीची जाणीव राखत दहशतवाद्यांविरोधात एकजुटीने काम करावे, अन्यथा तीव्र संघर्षाचा इशारा कित्तूरचे माजी आमदार महांतेश दोड्डगौडर यांनी दिला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, महानगर प्रमुख गीता सुतार, नगरसेवक श्र्रेयस नाकाडी, राजशेखर डोणी, हनुमंत कोंगाली, जयतीर्थ सवदत्ती, मुरगेंद्रगौडा पाटील यासह इतर उपस्थित होते.