वेमुला प्रकरणावरुन भाजप आक्रमक
काही वर्षांपूर्वी तेलंगणात गाजलेले रोहित वेमुला प्रकरण आजही अनेकांच्या स्मरणात आहे. वेमुला हा दलित विद्यार्थी होता. त्याने विद्यापीठातील छळाला कंटाळून आत्महत्या केली, असा अपप्रचार त्यावेळी जोरदारपणे करण्यात आला होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला त्यासाठी जबाबदार धरण्यात आले होते. राहुल गांधींनीही हे प्रकरण उचलून धरले होते.
तथापि, वेमुला हा दलित नव्हता. तसेच त्याने व्यक्तीगत कारणावरुन आत्महत्या केली. त्यासाठी हैद्राबाद विद्यापीठातील कोणीही जबाबदार नाही, असा अहवाल तेलंणा पोलिसांनी दिला आहे. त्यांनी हे आत्महत्या प्रकरण आता बंद करुन टाकले आहे. त्यामुळे त्यावेळी झालेल्या अपप्रचारावर आणि तो करणाऱ्यांवर आता भारतीय जनता पक्षाने जोरदार टीकाप्रहार करण्यास आरंभ केला आहे.
गांधींनी देशाची क्षमा मागावी
वेमुला दलित असल्याचा आणि छळामुळे त्याने आत्महत्या केल्याचा आरोप आणि अपप्रचार करुन राहुल गांधी यांनी विनाकारण भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. गेली सात वर्षे काँग्रेस असा अपप्रचार करीत आहे. आता काँग्रेसच्याच तेलंगणामधील सरकारने काँग्रेसचाच पर्दाफाश केला असून त्यामुळे काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी देशाची क्षमा मागावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. या प्रकरणाची फेरचौकशी करण्याचा आदेश आता देण्यात आला असला तरी तो काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या दबावाखाली देण्यात आला आहे, हे ही स्पष्ट होत आहे. काँग्रेसचे असत्यकथन आता उघड्यावर आले असून लोक या पक्षाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असा स्पष्ट इशारा भारतीय जनता पक्षाने शनिवारी दिला आहे.