शहर भाजपतर्फे विकसित भारत संकल्प सभा
बेळगाव : एक जागरुक नागरिक म्हणून 2047 मध्ये विकसित भारताची प्रतिज्ञा घेतो. भारतीय संविधानातील मूल्यांच्या समर्थनासाठी मत देऊन या कार्यात सहभागी होऊ. सार्वजनिक मालमत्तांचे संरक्षण व स्वच्छ भारत राखणे ही नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वच्छ, सुंदर व निरोगी भारतासाठी योगदान देऊ, असे संकल्प शहर भाजप कार्यकर्त्यांनी केले. चन्नम्मा सर्कलमधील कन्नड भवनमध्ये आयोजित विकसित भारत संकल्प सभेवेळी हे संकल्प केले. राष्ट्रीय अखंडता, एकता व बंधुता यासाठी जात, भाषा, भेद, लिंग व प्रादेशिकता सोडून भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा व महान वारशाचा आदर करतो.
महिलांचा सन्मान, आदर व सक्षमीकरणासाठी वचनबद्ध असून पर्यावरण, जलसंपत्तीचे संवर्धन व ऊर्जा कार्यक्षमता व्यवस्थापन या संवेदनशील गोष्टींसाठी जबाबदारीने काम करू. भ्रष्टाचारमुक्त, समान व सुसंवाद समाज निर्माणासाठी योग्य काम करत असून स्वावलंबी भारत निर्माणासाठी यशस्वी काम करण्यात येत आहे. एक जबाबदार, कर्तव्यदक्ष, देशभक्त म्हणून देशाची सेवा करून जीवन राष्ट्रसेवेसाठी समर्पित करू. 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी तन-मन-धन या भावनेने आम्ही कार्य करत राहू, असा संकल्पही करण्यात आला. यावेळी माजी आमदार संजय पाटील, गीता सुतार, उज्ज्वला बडवाण्णाचे, सुभाष पाटील, विजय कोडगनूर, युवराज जाधव, महांतेश कवटगी, मुरगेंद्रगौडा पाटील, अॅड. हणमंत कोंगाली, प्रसाद देवरमनी, शिल्पा केगरे, अशोक थोरात, विनोद लंगोटी आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.