चेन्नईत बंगालच्या मजुराचा उपासमारीमुळे मृत्यू
राज्यपाल बोस यांनी ममता बॅनर्जींना केले लक्ष्य
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी चेन्नईत एका मजुराच्या उपासमारीमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले आहे. उपासमारीमुळे जीव गमावलेला हा मजूर पश्चिम बंगालचा रहिवासी होता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मानवी जीवनासोबत खेळत असल्याचा आरोप राज्यपालांनी केला आहे.
पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला मजूर चेन्नईत उपासमारीमुळे मृत्युमुखी पडला होता. बोस यांनी राज्यातील स्थलांतरित कामगारांच्या दुर्दशेवर चिंता व्यक्त केली आहे. उपजीविकेच्या शोधात बंगालच्या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. बंगालचे लोक उपासमारीमुळे आणि गरीबीमुळे मृत्युमुखी पडत आहेत. बंगालमधील अनेक लोक रोजगाराच्या शोधात चेन्नईत गेले होते, परंतु तेथे त्यांना काम मिळाले नाही, यामुळे हे अनेक दिवसांपासून उपाशी होते असे राज्यपालांनी म्हटले आहे.
बंगालमधील या मजुरांपैकी समर खानचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण रुग्णालयात दाखल असून यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. राज्य सरकारने या स्थलांतरित कामगारांबद्दल संवेदनशील आणि उत्तरदायी असणे आवश्यक आहे. बंगालमध्ये रोजगार नसल्याने येथील लोक कामाच्या शोधात स्थलांतर करत आहेत असे राज्यपालांनी म्हटले आहे.