बेळगाव-कोल्हापूर रेल्वेमार्ग विकासासाठी फायदेशीर
प्राथमिक सर्वेक्षणाला सुरुवात : संकेश्वर-हुक्केरी-निपाणी-कागलसाठी वरदान
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-कोल्हापूर या बहुचर्चित रेल्वेमार्गाच्या प्राथमिक सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गाला समांतर रेल्वेमार्ग करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून केली जात होती. यामुळे केवळ प्रवासाचा कालावधीच कमी होणार नाही तर हुबळी-बेळगाव-कोल्हापूर या इंडस्ट्रियल कॉरिडॉरला चालना मिळणार आहे.
बेळगाव व कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात फौंड्री उद्योग पसरला आहे. या दोन्ही शहरांमध्ये व्यावसायिक, औद्योगिकदृष्ट्या समानता असल्यामुळे रेल्वेमार्गाची आवश्यकता भासते. सध्या बेळगावहून कोल्हापूरला रेल्वेने पोहोचायचे असेल तर बेळगाव ते मिरज व तेथून कोल्हापूर असा मोठा वळसा घालावा लागतो. हे अंतर बेळगाव ते कोल्हापूर अंतरापेक्षा दुप्पट होते.
...तर औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक फायदा
कोल्हापूरला थेट रेल्वेसेवा सुरू झाल्यास उत्तर कर्नाटकाला दक्षिण महाराष्ट्र जोडणे सहजशक्य होणार आहे. यामुळे औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक फायदा होणार आहे. महामार्गाला समांतर रेल्वेमार्ग झाल्यास संकेश्वर, हुक्केरी, निपाणी, कागल या शहरांचाही विकास होणार आहे. कणगला येथे कर्नाटक सरकारने औद्योगिक वसाहत वसवली असून, तेथून मालाची ने-आण करण्यासाठी रेल्वेचा मोठा उपयोग होऊ शकतो. याबरोबरच शेती व लघुउद्योगांनाही फायदा होणार आहे.
परकनट्टी येथून सर्व्हेच्या कामाला सुरुवात
नैर्त्रुत्य रेल्वेने सर्वेक्षणाची जबाबदारी पुणे येथील मोनार्क सर्व्हेअर्स अॅण्ड इंजिनियर कन्सल्टंट या कंपनीकडे सोपविली आहे. बेळगाव-मिरज रेल्वेमार्गासाठी परकनट्टी येथून सर्व्हेच्या कामाला सुरुवात झाली आहे. या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला रेल्वे बोर्डने मंजुरी दिली असून यामुळे बेळगाव-कोल्हापूरचे नाते अधिक जवळ येणार आहे.