बेळगाव-कोकण बसप्रवास उभे राहूनच!
बसफेऱ्यांचा तुटवडा : प्रवाशांची गैरसोय, बसमध्ये चेंगराचेंगरी
बेळगाव : कोकणात धावणाऱ्या बसफेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांचा अतिरिक्त ताण वाढला आहे. त्यामुळे कराड-बेळगाव, बेळगाव-राजापूर बससेवेला गर्दी वाढू लागली आहे. कोकणातून चाकरमान्यांसाठी मुंबईकडे दोन हजार बसेस धावत आहेत. त्यामुळे बेळगाव-कोकण मार्गावर बससेवा कमी झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना चेंगराचेंगरी करून आणि उभे राहूनच प्रवास करावा लागत आहे.
गणेशोत्सवामुळे प्रवाशी संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे विविध मार्गावर बसफेऱ्यांचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. शहरांतर्गत आणि आंतरराज्य मार्गावरही बसफेऱ्या कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सवातील प्रवास प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. कोकणात धावणाऱ्या बसफेऱ्या अगदी नगण्य झाल्याने प्रवाशांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. शुक्रवारी मालवण-बेळगाव बससेवाही ठप्प झाली. त्यामुळे कराड-बेळगाव बसमध्ये प्रवाशांची गर्दी झाली होती.
बेळगाव-कोकण मार्गावर बेळगाव आणि कोकणातील कराड, सावंतवाडी, मालवण, कणकवली आदी आगारातून बसेस धावतात. मात्र सध्या केवळ कराड-बेळगाव आणि बेळगाव आगाराची बेळगाव-राजापूर ही बससेवा सुरू आहे. इतर बसफेऱ्या ठप्प असल्याने या दोन बसेसवर प्रवाशांचा ताण वाढला आहे. त्यामुळे कोकणातील प्रवास चेंगराचेंगरी करून करावा लागत आहे. विशेषत: बेळगाव-कोकण प्रवास काहींनी उभे राहूनच पूर्ण केला. यामध्ये लहान बालक आणि वृद्धांची मोठी गैरसोय झाली.