बेळगाव-जयपूर विमानफेरी रद्द
कंपनीकडून तांत्रिक कारणाची सबब : प्रवाशांतून संताप
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-जयपूर विमान फेरी सोमवारी तांत्रिक कारणाने कंपनीने रद्द केली. अचानक विमान रद्द झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. यानंतर काही प्रवाशांना पुढच्या तारखेचे बुकिंग तर काही प्रवाशांना तिकिटाची रक्कम परत करण्यात आली. यामुळे वादावर पडदा पडला.
बेळगावहून दुपारी 3.35 वाजता जयपूरला विमान जाणार होते. बेळगावसह आसपासच्या परिसरातील प्रवासी विमानतळावर दोन तास अगोदरच दाखल झाले होते. परंतु, अचानक कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तांत्रिक कारणामुळे आजची विमान फेरी रद्द करत असल्याचे सांगितले. यामुळे प्रवाशांच्या पुढील प्रवासाचा फज्जा उडाला. पुढील बुकिंग रद्द करावे लागल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
वरचेवर विमानफेऱ्या रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांच्या नाराजीचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. सोमवारीही असाच प्रकार घडला. अखेर कंपनीने रिफंड, तसेच इतर तारखांना प्रवासाची संधी दिल्यामुळे प्रवासी शांत झाले. परंतु, यामुळे बेळगाव विमानतळापर्यंत पोहोचणे व तेथून घरी जाण्याचा भुर्दंड प्रवाशांना सोसावा लागला.