Kolhapur News: दारुची बाटली केली आडवी, मतदान घेतलं अन् दारुचं दुकान हद्दपाल झालं
निकालानंतर गावकऱ्यांनी एकत्रित येऊन घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला
पन्हाळा : पन्हाळगडाच्या पुर्व पायथ्याशी असलेल्या आंबवडे गावात दारुबंदीसाठी महिलांनी मतदानाने दारुची बाटली आडवी केली. दारुची आडव्या बाटलीसाठी 349 मते तर उभ्या बाटलीसाठी 31 तर 35 मते बाद झाल्याने गावातील दारुचे दुकान आता हद्दपार झाले आहे.
गावात मागील काही महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय दारुचे (बिअर शॉपी)चे दुकान सुरू करण्यात आले होते. हे दुकान बंद व्हावे यासाठी आज गावातील प्राथमिक शाळेत गावातील महिलांचे मतदान पार पडले. यामध्ये निकालानंतर गावकऱ्यांनी एकत्रित येऊन घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.
आंबवडे गावात सुरु झालेल्या बिअर शाँपी ही ग्रामपंचायतीच्या परवानगी शिवाय सुरु केले होते. याबाबत ग्रामस्थांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे चौकशी केली असता. या बिअरशाँपी धारकाने राज्य उत्पादन शुल्क खात्यावर न्यायलयात खटला दाखल करत आयुक्त स्तरावरुन परवानगी आणली होती अशी माहिती उघडकीस आली
होती.
याबाबत गावकऱ्यांनी गावसभा घेऊन दारुबंदीचा निर्धार करत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन सादर केले. त्यानुसार तहसिलदार माधवी शिंदे यांच्यावतीने दारुबंदीसाठी गावातील महिलांचे मतदान घेण्याचे ठरले. गावातील महिलांचे 17 जुलै रोजी सकाळी10 ते सायंकाळी 6 या वेळेत दोन टेबलावर मतदान प्रक्रिया राबवण्यात आली.
गावातील एकुण 599 महिला मतदारापैकी 415 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये आडव्या बाटलीसाठी म्हणजे दारुबंदीसाठी 349 मतदान झाले. तर विरोधात 31 मतदान होवुन 35 मतदान हे बाद ठरवण्यात आले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन तहसिलदार माधवी शिंदे यांनी हा निकाल घोषित केला.
मतदान प्रक्रियेसाठी 30 कर्मचारी,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक किशोक बिरदार, उपनिरीक्षक यांच्यासह 11 कर्मचारी याच्यासह पन्हाळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार सनदी ,सचिन पाटील यांच्यासह पोलिस बंदोबस्तासाठी हजर होते.
कोणताही अनुचित प्रकार न होता मतदान व मतमोजणी शांततेत पार पडले असून मतमोजणीचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करुन लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल असे तहसिलदार माधवी शिंदे यांनी सांगितले. निकालानंतर गावकऱ्यांनी ग्रामदैवताच्या नावाने विजयी घोषणा देत आनंद व्यक्त केला.
यावेळी सरपंच सरदार पाटील यांच्यासह गावकरी विशेषत:महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आदर्श गाव म्हणुन आंबवडे गावाची ख्याती संपुर्ण महाराष्ट्रात आहे. पुन्हा एकदा एकीचे दर्शन घडविले.