For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चित्तौडगढमध्ये ‘गौरव’ची लढाई

04:53 AM Nov 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
चित्तौडगढमध्ये ‘गौरव’ची लढाई
Advertisement

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी चितौडगड मतदारसंघाची उमेदवारी न मिळाल्याने दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले चंद्रभान सिंह आक्या यांच्या समर्थकांनी निदर्शने केली आहेत. हा विधानसभा मतदारसंघ भाजप प्रदेशाध्यक्ष सी.पी. जोशी यांच्या लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. आक्या यांनी पक्षाने उमेदवारी नाकारण्याचा निर्णय हा जोशी यांच्यामुळे घेतला असल्याचा आरोप आक्या यांनी केला आहे.

Advertisement

जुन्या राजकीय वैमनस्यामुळे मला लक्ष्य करण्यात आले आहे. ही निश्चितपणे ‘स्वाभिमाना’ची (गौरव) लढाई आहे. मी सदैव लोकांसोबत राहिलो असून नेहमी पक्षासाठी काम केले आहे. मला उमेदवारी का नाकारण्यात आली याचे कुठलेही कारण देण्यात आले नाही. एका बाहेरील व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु लोक माझ्यासोबत असून मी निवडणूक लढवावी अशी त्यांची इच्छा असल्याचा दावा आक्या यांनी केला आहे.

भाजपने या मतदारसंघात माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांचे जावई आणि पाचवेळा आमदार राहिलेले नरपत सिंह राजवी यांना उमेदवारी दिली आहे. आक्या यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय कायम ठेवल्याने भाजपसमोर संकट उभे ठाकले आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट करत आक्या यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Advertisement

राजवी हे यापूर्वी दोनवेळा या मतदारसंघात निवडून आले आहेत. मेवाड माझ्या हृदयात असल्याने मी बाहेरचा व्यक्ती कसा असे प्रश्नार्थक विधान राजवी यांनी केले आहे. राजवी यांनी 1993-98 आणि 2003-08 या कालावधीत चित्तौडगडचे आमदार म्हणून काम केले आहे.

Advertisement
Tags :

.