‘गॅरंटी’ वगळता राज्य सरकारची कामगिरी शून्य
केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची टीका : गॅरंटी योजना मोठी उपलब्धी नाही
प्रतिनिधी/ बेंगळूर
गॅरंटी योजना वगळता गेल्या तीन वर्षांत राज्य सरकारची कामगिरी शून्य आहे. राज्यात कोणतीही विकासकामे झालेली नाहीत, अशी टीका केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केली. बेंगळुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राज्य सरकारने गॅरंटी योजना वगळता अन्य कोणत्याही विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्याचे मुख्यमंत्रीही भाजपबद्दल मुख्यमंत्रिपदाच्या प्रतिष्ठेला न शोभणारे वक्तव्य करीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. मुख्यमंत्रिपदाला महत्त्व देण्याव्यतिरिक्त भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या घटनाही आपण पाहत आहोत. स्वत:ला अहिंद समाजाचे नेते म्हणणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या अहिंद समाजातील लोकांसाठी मोठे योगदान दिल्याचे सांगत आहेत. मात्र, वाल्मिकी निगमबद्दल बोलायचे झाल्यास, तिथे लूटमार झाली होती हे खुद्द मुख्यमंत्र्यांनी सभागृहात कबूल केले आहे, असेही मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सांगितले.
गंगा कल्याण योजनेतही लूट
गरिबांना दिल्या जाणाऱ्या गंगा कल्याण योजनेतही भ्रष्टाचार झाला आहे. कुमारस्वामी यांनी कांतराजू अहवाल थांबवला होता, असे मुख्यमंत्री म्हणतात. कांतराजू-जयप्रकाश हेगडे अहवाल प्राप्त होऊन किती महिने, किती वर्षे झाली आहेत? तुम्ही तो अहवाल थंड बस्त्यात का ठेवला आहे. तुम्ही त्याची अद्याप अंमलबजावणी का केली नाही, असा प्रश्नही कुमारस्वामींनी उपस्थित केला.
अंतर्गत आरक्षणाच्या मुद्यावर गप्प का?
अंतर्गत आरक्षणाच्या मुद्यावर रस्त्यावर अनेक आंदोलने सुरू आहेत. तुम्ही गप्प का आहात. गॅरंटी योजना ही मोठी उपलब्धी नाही. स्वातंत्र्यानंतर आम्ही शोषित वर्गाला वर आणण्यासाठी पुरेशा योजना आणल्या आहेत. हा असा कार्यक्रम नाही जो कोणी केलेला नाही. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आपण देशात दुसऱ्या क्रमांकावर आहोत, असे तुम्ही म्हणता. कर्नाटकातील प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, असा तुमच्या विधानाचा अर्थ होतो. जर आर्थिक सुरक्षा असेल तर 2,000 ऊपयांच्या अशा मोफत गॅरंटींची काय गरज आहे, असाही प्रश्न एच. डी कुमारस्वामी यांनी केला.