बांगलादेश संघ चेन्नईत दाखल
वृत्तसंस्था/ चेन्नई
बांगलादेश क्रिकेट संघाचे रविवारी येथे आगमन झाले. यजमान भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि त्यानंतर 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. पहिल्या कसोटीला येथे 19 सप्टेंबरला प्रारंभ होत आहे.
अलिकडेच बांगलादेश संघाने पाकच्या भूमीवर यजमान पाकचा कसोटी मालिकेत 2-0 असा एकतर्फी पराभव करुन नवा इतिहास घडविल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या आगामी मालिकेत बांगलादेशचा संघ दर्जेदार कामगिरी करेल, असा विश्वास कर्णधार नजमुल हुसेन शांतोने वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला. बांगलादेश संघातील खेळाडू पाकमधील विजयानंतर अधिक सरस कामगिरी करतील. भारतातील खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल असल्याने बांगलादेशचे फिरकी गोलंदाज प्रभावी ठरतील, असे कर्णधार शांतोने म्हटले आहे. ही कसोटी मालिका आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत राहिल. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारत सध्या अग्रस्थानावर आहे.