जिल्ह्यात केळी उत्पादकांना फटका
पाणी समस्या : वीजपुरवठा ठप्प, उत्पादक दुहेरी संकटात
बेळगाव : दुष्काळाचा फटका बागायत पिकांनाही बसला आहे. नदी, नाले, विहिरी आणि कूपनलिकाच्या पाणी पातळीत मोठी घट झाल्याने बागायत पिकांनाही पाणी मिळणे अशक्य होऊ लागले आहे. त्यातच चिकोडी येथील कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे केळी उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. ऐन हंगामात पाण्याविना केळीबागायतीचे नुकसान होऊ लागले आहे. बेळगाव जिल्ह्यात 772.39 हेक्टर क्षेत्रात केळीचे क्षेत्र आहे. सर्वाधिक यरगट्टी तालुक्यात केळी बागायती आहेत. मात्र पाणी, वीज आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे केळी पिकाचे नुकसान होवू लागले आहे. विशेषत: उन्हाळी हंगामात केळ्यांची मागणी अधिक असते. लग्नसराई आणि यात्रा-जत्रांमुळे बाजारात केळ्यांना मागणी वाढली आहे. मात्र केळी बागायतदार अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे येत्या काळात केळी उत्पादनावरही परिणाम होणार आहे. जिल्ह्यातील यरगट्टी, सौंदत्ती, रामदुर्ग, गोकाक, मुडलगी, अथणी, कागवाड, मुडलगी, चिकोडी, हुक्केरी आदी तालुक्यात केळीचे उत्पादन घेतले जाते. त्याबरोबर इतर तालुक्यांतही केळीचे उत्पादन होते. मात्र यंदा पावसाअभावी बागायती पिकेही अडचणीत येवू लागली आहेत. विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी तळाला गेले आहे. त्यातच काही ठिकाणी अघोषित वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे पिके होरपळून जावू लागली आहेत. विशेषत: विजेअभावी दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांची दयनीय अवस्था होवू लागली आहे. जिल्ह्यात 2 लाखांहून अधिक शेतकरी बागायत शेती करतात. अलिकडे बागायती शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. विशेषत: काजू, आंबा, द्राक्षे, केळी, डाळींब, पेरु, पपई, कलिंगड आदीचे उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा कमी पाण्याचा परिणाम बागायतीवर होवू लागला आहे.
ठिबक खरेदीसाठी देखील सवलत
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याला अधिक महत्त्व दिले जात आहे. शेतकऱ्यांना ठिबक सिंचनची पद्धत अवलंबवावी, यासाठी जागृती केली जात आहे. त्याबरोबर ठिबक खरेदीसाठी देखील सवलत दिली जात आहे. त्यामुळे पिकांना कमी पाणी लागण्यास मदत होणार आहे.
महांतेश मुरगोड-सहसंचालक बागायत