Solapur News | करमाळ्यात वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त
गावांमधील उभ्या केळीच्या बागा संपूर्णपणे जमीनदोस्त
करमाळा : करमाळा विधानसभा मतदारसंघात रविवारी रात्री अचानक आलेल्या भीषण वादळी वाऱ्याने प्रचंड हाहाकार माजवला आहे. या नैसर्गिक आपत्तीत तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक गावांमधील उभ्या केळीच्या बागा संपूर्णपणे जमीनदोस्त झाल्या आहेत. पोमलवाडी येथे एका घराची भिंत अंगावर कोसळून पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
प्राथमिक अंदाजानुसार तालुक्यात हजारो कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पोमलवाडी येथे मोठी दुर्घटनावादळी वाऱ्याच्या तीव्रतेमुळे पोमलवाडी (ता. करमाळा) येथील जगन्नाथ मारुती नवले व शालन जगन्नाथ नवले या दाम्पत्याच्या राहत्या घराची भिंत कोसळली.
या दुर्घटनेत घराखाली दाबले गेल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. केळीच्या बागा आणि सोलर यंत्रणा उद्ध्वस्त, पश्चिम भागातील पोमलवाडी, गुलमोहरवाडी, भगतवाडी, केतूर, खातगांव, पारेवाडी आणि हिंगणी या गावांना वादळाचा सर्वाधिक फटका बसला.
शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा क्षणात भुईसपाट झाल्या. शेतातील महागडी सोलर पंप यंत्रणाही मोडून पडली आहे. गुलमोहरवाडी येथील रवी माळशिकारे, दयाल माने, पोमलवाडी येथील उमेश नवले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी आमदार कार्यालयाला फोन करून नुकसानीचे फोटो पाठवले आहेत.
प्रशासनाला तातडीचे आदेश घटनेची गंभीर दखल घेत आमदार नारायण पाटील यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे आणि तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके यांना तातडीने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व बाधित क्षेत्रांचे युद्धपातळीवर पंचनामे करून अंतिम अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना
नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नवले दांपत्याचा मृत्यू वेदनादायी आहे. प्रत्यक्ष नुकसानीचा अहवाल आल्यानंतर, आपण शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहोत. आगामी पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न लावून धरून नुकसानग्रस्तांना न्याय मिळवून देऊ.
- नारायण पाटील, आमदार