Banana Cultivation: केळी पिकातून शोधला प्रगतीचा मार्ग, जांभूरच्या प्रकाश पाटील यांचा अनोखा प्रयोग
जांबूर परिसरात पाण्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे
By : संतोष कुंभार
शाहूवाडी : पारंपरिक पिकांची लागवड न करता पर्यायी पिकातून आर्थिक प्रगतीचा मार्ग शाहूवाडी तालुक्यातील एका शेतकऱ्याने शोधला आहे. जांभूर येथील प्रकाश लक्ष्मण पाटील या युवा शेतकऱ्याने कायमच नवीन पीक घेऊन शेतकऱ्यांसमोर आदर्श उभा करण्याची प्रयोगशील वृत्ती जपलीय.
आपल्या शेतीत विविध प्रयोग करताना नवतंत्रज्ञान आत्मसात करत त्यानी नवनवीन पिके घेतली आहेत. त्यांनी केळीची लागवड करत एक पर्यायी पिकाची उभारणी केली आहे. प्रकाश यांनी वडील लक्ष्मण पाटील आणि कुटुंबीयांच्या साथीने त्यांनी नेहमीच आपली शेती यशस्वी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
नोकरीच्या मागे न लागता आपल्या शेतीतून अधिक उत्पादन घेण्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्यात. जांबूर परिसरात पाण्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे. याचा फायदा घेत त्यांनी आपल्या शेतीत आमुलाग्र बदल केला. शेतीत भेडसावणाऱ्या विविध समस्यांना सामोरे जात योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास शेती हा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो हेच त्यांनी विविध पिकातून दाखवून दिले आहे.
केळी लागवडीचे केले नियोजन शेतीत वन्य प्राण्यांचा फार मोठ्या प्रमाणात उपद्रव सुरू झाला आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतीत प्रयोगशील वृत्ती आणि नवीन पीक घेणे आवश्यक असल्याचा विचार करत त्यांनी 27 मार्च 2025 रोजी ‘झी नाईन’ या जातीच्या केळीच्या रोपांची लागवड केली.
दोन एकरामध्ये त्यांनी अडीच हजार रोपांची लागवड करत नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले. वर्षभरात केळी उत्पादनाला सुरुवात होणार या दृष्टिकोनातून त्यांनी नियोजन केले आहे. नेहमी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न प्रकाश पाटील यांनी यापूर्वी देखील आपल्या शेतीमध्ये भाजीपाला पिकाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.
याशिवाय फळबाग लागवड, जनावरांच्या संगोपनामध्ये देखील त्यानी नेहमीच सातत्य ठेवले आहे. जांबूरसारख्या दुर्गम भागातील युवकाने शेती विषयी जपलेली आत्मियता आणि त्यातून नवीन पीक घेत नवनवीन प्रयोग, नव तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केलाय. खते आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापनाबाबत देखील ते विशेष खबरदारी घेतात.
"अलीकडच्या काळात शेती खूप अडचणीची ठरत आहे. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. खते, बियाणे कीटकनाशकांचा खर्च वाढतोय. मजुरांची टंचाई, वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीवर विशेष लक्ष केंद्रित करावे लागत आहे. अशावेळी नवीन पीक घेत पूर्ण खबरदारी आणि काळजीपूर्वक नियोजन केल्याने शेतीत यशस्वी होऊ शकतो. गेले अनेक वर्ष सातत्य ठेवल्याने मी विविध पिके घेण्यात यशस्वी झालो आहे."
- प्रकाश पाटील, केळी उत्पादक, जांभूर
तज्ञांचे मार्गदर्शन आणि भेटी
आपण घेत असलेल्या पिकाबाबत आपणास अधिक माहिती मिळावी, याबाबत प्रकाश पाटील नेहमीच खबरदारी घेत असतात. या माध्यमातून आपल्या शेतीवर अनेक तज्ञांना पाचारण करत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात. याशिवाय प्रयोगशील शेतीला देखील भेट देत नवीन माहिती आत्मसात करत ते आपली शेती यशस्वी करत आहेत.
