व्हीआयपी दर्शनावर 31 मेपर्यंत बंदी
चारधाम यात्रेप्रकरणी मुख्यमंत्री धामींचा मोठा निर्णय
वृत्तसंस्था /देहरादून
यंदा चारधाम यात्रेत मोठ्या संख्येत भाविक सहभागी झाल्याने प्रशासन काहीसे हतबल झाल्याचे चित्र दिसून आले होते. 10 मे रोजी केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीत दर्शनास प्रारंभ झाला होता. तर बद्रीनाथमध्ये 12 मेपासून दर्शन सुरू झाले हेते. चारधाम यात्रेदरम्यान प्रचंड गर्दी होत असल्याने उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मोठे पाऊल उचलले आहे. चारही धामांमध्ये व्हीआयपी दर्शनावर 31 मेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. यासंबंधीचा आदेश मुख्य सचिवांनी जारी केला आहे. या आदेशाचे पत्र सर्व राज्यांना देखील पाठविण्यात आले आहे. याचबरोबर आता यात्रा नोंदणीचे कठोरपणे पालन केले जाणार आहे. ट्रिप कार्ड आणि नोंदणीशिवाय कुठल्याही वाहन आणि भाविकांना पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. नोंदणीशिवाय भाविकांना नेणाऱ्या वाहनांचा परवाना रद्द करण्याचे निर्देश आहेत. मुख्य सचिवांच्या निर्देशानंतर परिवहन विभाग गुरुवारपासून सक्रिय झाला आहे. नोंदणीविना तसेच नोंदणी केल्यावर निश्चित तारखेपूर्वीच यात्रेत सहभागी होणाऱ्या लोकांचा मोठा आकडा आहे. याचमुळे चारधाम यात्रा मार्गावर प्रचंड कोंडी निर्माण झाली आहे. याचमुळे आता तपासणी नाक्यांवर अधिक कठोरपणे तपासणी केली जात आहे. चारधाममध्ये मंदिरांमध्ये आता भाविकांना मोबाईल नेता येणार नाही. चारही धामांच्या ठिकाणी मंदिराच्या 200 मीटरच्या कक्षेत मोबाईल नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासंबंधीचा आदेश मुख्य सचिव राधा रतूडी यांनी जारी केला आहे.