गुटखा-तंबाखूच्या प्लास्टिक पाऊचवर बंदी
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाची माहिती
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
आता लवकरच गुटखा, तंबाखू आणि पान मसाल्याचे प्लास्टिक पाऊच दिसणार नाहीत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने म्हटले आहे की, पान मसाल्याच्या पॅकेजिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक साहित्याच्या जागी आता कागद, पेपरबोर्ड, सेल्युलोज आणि इतर पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला जाणार आहे.
यासाठी, एफएसएसएआयने मंगळवारी ‘अन्न सुरक्षा आणि मानक (पॅकेजिंग) नियम, 2018“ वर संशोधनासाठी एक मसुदा जारी केला आहे. ‘प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2026“ या मसुद्यावर पुढील 30 दिवसांसाठी संबंधित घटकांकडून मते आणि आक्षेप मागवण्यात आले आहेत. यानंतर हा नियम अंतिम केला जाईल.
प्लास्टिक किंवा विनाइलचा वापर नाही
नवीन प्रस्तावानुसार, गुटखा, पान मसाला आणि तंबाखूच्या कोणत्याही पॅकेजमध्ये कोणत्याही स्वरूपात प्लास्टिक साहित्याचा वापर करता येणार नाही.
‘व्हीनाइल अॅसिटेट-मॅलिक अॅसिड-व्हीनाइल क्लोराइड कोपॉलिमर“ सारखी रसायने असलेल्या सामग्रीवरही बंदी घालण्यात येईल.
कागद, सेल्युलोजपासूनच्या पाऊचचा पर्याय
प्लास्टिक पाऊचऐवजी कागद, कार्डबोर्ड (पेपरबोर्ड) आणि सेल्युलोज यांसारख्या नैसर्गिक सामग्रीचा वापर करावा, असा सल्ला एफएसएसएआयने दिला आहे. नियामकांच्या मते, अन्न आणि पेय पदार्थांच्या पॅकेजिंगसाठी या वस्तू पूर्णपणे सुरक्षित आहेत. तसेच, कंपन्यांना या नवीन सामग्रीचा स्वीकार करणे आणि वापरणे सोपे जाईल.
टिन, काचेच्या कंटेनरचा पर्याय
आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याच्या मते, जे उत्पादक पाऊचऐवजी टिन किंवा काचेचे कंटेनर वापरत आहेत, त्यांना तसे करणे सुरू ठेवता येईल. यामुळे उत्पादकांना त्यांच्या व्यावसायिक गरजांनुसार लवचिकता मिळेल, मात्र त्यांनी नियामक चौकटीत राहणे आवश्यक आहे.