रुमेवाडी क्रॉस ते ब्रिजकम बंधाऱ्यापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था
खानापूर : रुमेवाडी क्रॉसपासून ब्रिजकम बंधाऱ्यापर्यंतचा रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने गुडघाभर पाणी साचले आहे. या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. जिल्हा पंचायतीच्या अखत्यारीत हा रस्ता येत असल्याने नगरपंचायतीने या रस्त्याबाबत हात वर केल्याने गेल्या चार वर्षापासून या रस्त्याची समस्या काही सुटलेली नाही. रुमेवाडी क्रॉसपासून पारिश्वाड क्रॉसपर्यंत जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावरुन वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने या रस्त्यावरुन वाहतूक करणाऱ्यांना धोकादायक खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे. जिल्हा पंचायतीने याबाबत तातडीने लक्ष घालून या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
गेल्या पाच वर्षापूर्वी मलप्रभा नदीवरील जुना बंधारा काढून त्या ठिकाणी नवा बंधारा बांधण्यात आला आहे. तेंव्हापासून या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या खड्ड्यांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप निर्माण होते. हा रस्ता जि. पं.कडे येत असल्याने नगरपंचायतीने या रस्त्याच्या देखभालीबाबत हात वर केलेले आहेत. रुमेवाडी क्रॉस ते ब्रिजकम बंधाऱ्यापर्यंतचा तीनशे मीटरचा रस्ता जि. पं.कडे येत असल्याने रस्ता दुरुस्तीकडे जि. पं.ने गेल्या पाच वर्षापासून साफ दुर्लक्ष केल्याने दरवर्षी या ठिकाणी खड्ड्यांत मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करताना दुचाकीस्वारांचे अपघात घडत आहेत.