बाबुश खऱ्या अर्थाने भाजपमय
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : पणजीत भाजप कार्यकर्ता मेळावा उत्साहात
पणजी : पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांचे कार्य देश, राज्य आणि पणजीच्या हितासाठी सुरू आहे. त्यांचा स्वभाव थोडा लाजाळू असल्याने ते कदाचित मोठ्या कार्यक्रमाला उपस्थित राहत नसतील, पण जनतेला मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. ते काँग्रेसमधून भाजपात आले तेव्हा भाजप संस्कृतीत ऊळणार नाहीत असेच सर्वांना वाटत होते. पण, आता खऱ्या अर्थाने ते भाजपमय झाले आहेत. येत्या 2027 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना 52 टक्के मताधिक्याने निवडून आणूया, असा निर्धार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजप कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.
पणजी येथे काल बुधवारी पणजी मतदारसंघासाठी आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर, सर्वानंद भगत, प्रेमानंद म्हांबरे, मंगेश कामत, ऊपेश कामत, पणजी भाजप गटाध्यक्ष पुंडलिक शेटये, संजीव देसाई, दयानंद काणकोणकर, वसंत आगशीकर, शुभम चोडणकर, देवानंद नाईक, नायसा कुतिन्हो, शांताराम नाईक, मांगिरीश उसगांवकर, व इतर पदाधिकारी हजर होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, स्मार्ट सिटीच्या कामामुळे जनतेला त्रास सहन करावा लागला असला तरी भविष्यात पणजी शहर राज्यातील नंबर एक क्रमांकवरील शहर असेल. थोड्याच दिवसात सांतिनेज आणि पाटो नाला स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. पणजीचे आमदार मोन्सेरात म्हणाले, मी निवडून आल्यानंतर कधीच कोणाबद्दल भेदभाव केला नाही. ज्याने आपल्याला मत दिले नाही तोही आपल्यातलाच आहे त्याच्यापर्यंतही सर्व योजना पोचवण्याचे आपले कर्तव्य आहे, या भावनेतूनच कार्यरत राहिलो. पणजी शहर राज्यातील नंबर वन शहर बनवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी व पणजीच्या जनतेने यापुढेही साथ द्यावी, असेही मोन्सेरात म्हणाले.
प्रत्येकाने बूथ पालक व्हावे : तानावडे
राज्यसभा खासदार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत पणजी मतदारसंघात 52 टक्के मताधिक्य मिळावे, यासाठी पणजीच्या भाजप कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. 52 ही टक्केवारी प्राप्त केल्यास भाजप परत सत्तेवर तर येईलच व त्यामुळे विकास झपाट्याने होईल. लोकसभा निवडणुकीत राज्यातील 51 टक्के मते भाजपला मिळाली होती आता 52 टक्के मते मिळवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी श्रम घेतले पाहिजेत. प्रत्येकाने बूथ पालक झाले पाहिजे असे ते म्हणाले.
भाजपने दिलेली पदे शोभेसाठी नव्हेत
भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रामाणिक आणि निष्ठाप्रेमी असला पाहिजे. निष्ठा आहे, पण पक्षाच्या कामात त्याचा काहीच उपयोग होत नसेल, तर असे कार्यकर्ते काय कामाचे? कारण भाजपच्या प्रवासात आतापर्यंत अनेकजणांनी त्याग केलेला आहे. त्या भावनेतूनच आताच्या भाजप कार्यकर्त्यांनी व गटाध्यक्षांनी कार्यरत राहणे गरजेचे आहे. भाजपने दिलेली पदे ही शोभेसाठी नाहीत. कार्यकर्त्यांना भविष्यात लाभ घ्यायचा असेल तर ‘कमळ’ हे भूषण आहे, याची जाणीव ठेवावी आणि येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आणावे, असे आवाहन दामू नाईक यांनी कार्यकर्त्यांना केले.
मुख्यमंत्र्यांचे राहुल गांधींना खुले आव्हान
काँग्रेस हा पक्ष केवळ लोकांची दिशाभूल करण्यातच आपला वेळ घालवत आहे. खरोखरच काँग्रेसने जर विकास केला असेल तर त्यांनी जनतेला सांगावे. काँग्रेसची एकतरी प्रभावी योजना राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्याने सांगावी, असे खुले आव्हान मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मेळाव्यात दिले. संविधान निर्माते, युगपुऊष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान हा काँग्रेसनेच अनेकदा केलेला आहे. मुंबई येथून डॉ. आंबेडकर हे निवडणुकीसाठी उभे राहिले असताना ते जिंकून येऊ नयेत, यासाठी काँग्रेसनेच राजकारण केले आणि संविधान निर्मात्याला बाजूला केले. त्यामुळे राहुल गांधी किंवा इतर काँग्रेसच्या नेत्यांनी संविधानावर बोलण्याचा अधिकार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेसवर टीका करताना सांगितले.