30 एप्रिलला सुनावणीस हजर राहणार बाबा रामदेव
पतंजलीच्या माफीनाम्यावर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद, बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांच्या विरोधात अवमानाप्रकरणी मंगळवारी सुनावणी केली आहे. सुनावणीदरम्यान बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयाने पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकांना दोन दिवसांत वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित माफीनाम्याचा तपशील सादर करण्याचा आदेश दिला आहे. तसेच बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांना 30 एप्रिल रोजी पुन्हा हजर रहावे लागणार आहे.
सुनावणीदरम्यान बाबा रामदेव यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये सोमवारी माफीनामा छापून आणला असल्याची माहिती दिली. 67 वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देण्यात आल्या असून याकरता 10 लाख रुपयांचा खर्च आला असल्याचे त्यांनी सांगितले. या जाहिराती कुठे प्रकाशित करण्यात आल्या आणि याकरता इतका वेळ का लागला असा प्रश्न न्यायालयाने रामदेव आणि बालकृष्ण यांना विचारला. याचबरोबर पतंजलीच्या जाहिरातीच्या आकाराइतका माफीनामा प्रकाशित करण्यात आला अशी विचारणाही खंडपीठाने केली.
सह-प्रतिवादीच्या स्वरुपात ग्राहक विषयक मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला देखील आम्ही प्रश्न विचारत आहोत. देशभरातील राज्य परवाना अधिकाऱ्यांना देखील काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.