अयोध्या तीर्थदर्शनासाठी 800 ज्येष्ठ रत्नागिरीकर रवाना, पहिली तीर्थदर्शन रेल्वे मार्गस्थ
कोकणातील पहिली तीर्थदर्शन रेल्वे मार्गस्थ; पालकमंत्री उदय सामंत यांनी दाखवला हिरवा झेंडा
रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वेस्थानकावरुन जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिकांना अयोध्येला तीर्थदर्शनासाठी घेऊन जाणारी कोकणातील पहिली रेल्वे शनिवारी रवाना झाली. पालकमंत्री उदय सामंत यांनी फित कापून आणि या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ केला. या प्रवासात कुठच्याही ज्येष्ठ नागरिकाला त्रास होणार नाही, त्यांना कोणतेही कमतरता भासणार नाही, याची काळजी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे सांगून सुरक्षित जा, सुरक्षित या, अशा शुभेच्छा सामंत यांनी दिल्या.
रत्नागिरी रेल्वेस्थानकात या तीर्थदर्शन रेल्वे उपक्रमाच्या शुभारंभाचा सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी मंत्री सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सामंत यांनी फित कापून या उपक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, समाजकल्याण विभागाचे
जमलं तर तुमचा मुलगा म्हणून स्वागताला येण्यासाठी प्रयत्नशील
येत्या १ मे ला झेंडावंदनासाठी रत्नागिरीला येईन तेव्हा घरच्यांपेक्षा जास्त चांगली काळजी या प्रवासात आमची घेतली गेली, असे मला सर्व ज्येष्ठांनी सांगितले पाहिजे. मला जमलं तर पुन्हा येत असताना तुमच्या स्वागतालाही तुमचा मुलगा म्हणून या रेल्वेस्टेशनला मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करीन. मला शक्य झाले नाही तर अधिकारी, माझे पदाधिकारी नक्की उपस्थित राहतील.
सुरक्षित जा, सुरक्षित या, अशा शुभेच्छा पालकमंत्री सामंत यांनी दिल्या. माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, बिपीन बंदरकर उपस्थित होते. यावेळी तीर्थदर्शन योजनेचा लाभ मिळालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा तुळशीमाळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रातनिधीक स्वरुपात पालकमंत्री यांच्या हस्ते अयोध्येला जाण्यासाठीची रेल्वे तिकीटही देण्यात आली.
प्रभू श्रीराम मंदिरांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केलेय
अयोध्या तीर्थदर्शनाला जातानाचा अडीच दिवसाचा प्रवास आणि येतानाचा अडीच दिवसाचा प्रवास आहे. जसे घरामध्ये मुले आई - वडिलांना जी सेवा करतात, मुले ज्याप्रमाणे आई-वडिलांची काळजी घेतात, त्यापेक्षा जास्त काळजी आपण सर्वांनी या सगळ्या ज्येष्ठांची घ्या. त्यांच्या आयुष्यातला हा आनंदाचा दिवस आहे. जे आपल्या सर्वांचे स्वप्न होते, ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. त्या राम मंदिराचे, त्या रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला रवाना होत आहात, असे मंत्री सामंत म्हणाले.
ज्येष्ठांच्या काळजीसाठी आरोग्य पथक
तीर्थदर्शन रेल्वेत ज्येष्ठांना त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टरांसोबत आरोग्य पथक ५ दिवस आपल्या सोबत राहणार आहे. आपण स्वत: ही आपली काळजी घ्या, असे मंत्री उदय सामंत यांनी सर्व प्रवासी ज्येष्ठ नागरिकांना सांगितले. तसेच मला पूर्ण खात्री आहे, या रेल्वेतील कर्मचारी, अधिकारी आपण सगळे आमचे आई-वडील असल्याप्रमाणे आपल्या सर्वांची काळजी घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
योजनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय
६० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना मुलांवर अवलंबून न राहता तीर्थदर्शन व्हावे, यासाठी प्रत्येकी ३० हजार देऊन तीर्थदर्शन योजना करावी, हा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता. आज आपल्या जीवनातला सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखा क्षण आहे. कारण कोकणातून पहिली रेल्वे आपल्या सर्वांना घेऊन अयोध्येला रवाना होते. पाण्याची, जेवण्याची व्यवस्था चांगली असली पाहिजे. स्वच्छताही चांगली असली पाहिजे. अजून निधीची गरज लागत असेल तर जिल्हा नियोजन समितीमधून ज्येष्ठांसाठी आजच मंजूर करायला आपण तयार आहोत, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.