एवायसी, यमकनमर्डी, रामनगर संघ विजयी
डॉ. सतीश जारकीहोळी चषक टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : बेळगाव जिल्हा वाल्मिकी समाज व भातकांडे स्पोर्ट्स अकादमी आयोजित डॉ. सतीश जारकीहोळी कर्नाटक राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत एवायसी संघाने शक्ती बॅटरी संघाचा, चॉईस यमकनमर्डीने आर्यन स्पोर्ट्सचा तर रॉयल मराठा रामनगरने श्री अद्वैश्वरी संघाचा पराभव करुन पुढील फेरीत प्रवेश केला. प्रशांत गावडे, मारुती खैरमुंडी व फिरोज नालबंद यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात श्री अद्वैश्वरी संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 56 धावा केल्या. त्यात सोहेलने 1 षटकार 2 चौकारास 20 तर अजिम शेखने 11 धावा केल्या. रॉयल मराठा रामनगरतर्फे रोहीत देसाईने 19 धावांत 2 तर प्रशांत गावडे, साईराज घोरपडे व अनिल गावडे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉयल मराठा रामनगरने 5.1 षटकात 3 गडी बाद 57 धावा करुन सामना 7 गड्यांनी जिंकला. अनिल गावडेने 3 षटकार 3 चौकारांसह 18 चेंडूत 34, प्रशांत गावडेने 2 षटकार 1 चौकारासह 20 धावा केल्या. अद्वैश्वरीतर्फे परशराम, यल्लाप्पा व शितल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात एवायसी अजमनगरने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 77 धावा केल्या.
त्यात परशराम गुरवने 2 षटकार 1 चौकारासह 25, फिरोज नालबंदने 1 षटकार 2 चौकारासह 22 तर अजिम माडीवालेने 16 धावा केल्या. शक्ती बॅटरीतर्फे रवी के.ने 3 धावांत 2 तर संजय, अजित व देवाप्पा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना शक्ती बॅटरी संघाने 8 षटकात 6 गडी बाद 51 धावा केल्या. त्यात आर्यन कांबळेने 2 षटकार 1 चौकारासह 23, दिनेश पुजारीने 18 धावा केल्या. एवायसीतर्फे कैयुम पिरजादेने 6 धावांत 4 तर फिरोज नालबंदने 1 गडी बाद केला. तिसऱ्या सामन्यात चॉईस इलेव्हन यमकनमर्डी संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 95 धावा केल्या. त्यात मारुतीने 3 षटकार 4 चौकारासह 16 चेंडूत 37, मोजीद नालबंदने 3 चौकारासह 24 तर शाम कामानाने 19 धावा केल्या. आर्यन स्पोर्ट्सतर्फे आसीफने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल आर्यन स्पोर्ट्सचा डाव 7.1 षटकात 53 धावांत आटोपला. त्यात आक्रम पिरजादेने 2 षटकारासह 20, मोसीन शेखने 15 धावा केल्या. यमकनमर्डीतर्फे मोजीद नालबंदने 3 धावांत 3, मारुतीने 8 धावांत 3 तर महांतेशने 5 धावांत 2 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे यल्लाप्पा कोप्पद, उदयकुमार तळवार, प्रमोद देशपांडे, सौरभ पाटील, मिलिंद भातकांडे, साईराज तलवार, आदी मान्यवरांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आले.