अविमुक्तेश्वरानंदांना बोलण्याचा अधिकारच नाही ! स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांचे प्रतिपादन
प्राणप्रतिष्ठा मुहूर्त योग्यच, स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांचे स्पष्ट प्रतिपादन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भगवान रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त अतिशय योग्य आणि अत्यंत शुभ आहे. त्या मुहूर्तावर आक्षेप घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना राममंदिरासंबंधी काहीही बोलण्याचा अधिकारच नाही. कारण ते मुळात शंकराचार्यच नाहीत. त्यांच्या पट्टाभिषेकाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, असे खळबळजनक प्रतिपादन स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी रविवारी पत्रकारांसमोर केले आहे.
अविमुक्तेश्वर हे स्वत:ला ज्योतिषपीठाचे शंकराचार्य मानतात. पण ते तसे नाहीत. त्यांना या पीठाचे शंकराचार्य व्हायचे होते. पण हे प्रकरण गेली कित्येक वर्षे न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या पट्टभिषेकाला स्थगिती दिल्याने ते स्वत:ला शंकराचार्य म्हणवून घेऊ शकतच नाहीत. कोणताही अधिकार नसताना ते विधाने करीत असून ती विधाने संपूर्णपणे अयोग्य आहेत, असे वासुदेवानंद सरस्वती यांचे म्हणणे आहे. तसेच अविमुक्तेश्वरांना प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच आमंत्रणही पाठविण्यात आलेले नाही. कारण ते अधिकृत शंकराचार्य नाहीत. केवळ समाजात गोंधळ व्हावा म्हणून ते विधाने करीत आहेत. त्यांनी असे करणे योग्य नाही, असेही स्पष्ट प्रतिपादन स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी केले आहे.
मुहूर्त योग्यच
भगवान रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी निर्धारित करण्यात आलेला मुहूर्त सर्वथैव योग्य आहे. तसेच मंदिराचे शिखर पूर्ण नसतानाही गर्भगृहात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करता येते. त्यात काहीही अयोग्य नाही. भारतात 9 प्राचीन आणि आर्वाचित मंदिरे अशी आहेत, की ज्यांच्या शिखराचे आणि इतर निर्माणकार्य पूर्ण झालेले नसतानाही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. काही मंदिरांचे पूर्ण निर्माण कार्य 200 वर्षे उलटून गेली तरी झालेले नाही. पण त्या मंदिरांमध्ये मूर्तीची प्राणपतिष्ठा झालेली आहे, अशी महत्वपूर्ण माहितीही त्यांनी दिली.
वासुदेवानंद सरस्वती हे कोण ?
स्वामी वासुदेवानंद सरस्वती हेच ज्योतिषपीठाचे खरे शंकराचार्य असल्याचे प्रतिपादन करतात. त्यांचा पट्टाभिषेक अनेक वर्षांपूर्वी झालेला आहे. तो त्यांच्या गुरुंनी केला आहे. त्यामुळे ते या पीठाचे अधिकृत शंकराचार्य आहेत. अविमुक्तेश्वरानंद यांनी त्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका सादर केली आहे. पण न्यायालयाने त्यांच्याच पट्टाभिषेकाला स्थगिती दिल्याने सध्या या पीठाचे अधिकृत शंकराचार्य आपण स्वत: आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.