वेध बारावीनंतरच्या प्रवेशाचे !
कोल्हापूर :
बारावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाचे वेध लागले आहेत. विज्ञान विभागातील बहुतांश विद्यार्थी मेडिकल, फार्मसी, अभियांत्रिकी, नॅनोसायन्स व टेक्नॉलॉजी, यासह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची तयारी करीत आहेत. तर वाणिज्य शाखेचे विद्यार्थी सी. ए., बीकॉम तर कला शाखेचे विद्यार्थी बी. ए. ला प्रवेश घेण्याची तयारी करीत आहेत. बारावीचे मूळ गुणपत्रक मिळाल्यानंतर पदवी प्रथम वर्षाच्या सर्व अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहेत.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटी सेलच्या वतीने परीक्षा घेतली होती. याचा निकाल 15 मे नंतर लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर सीईटी सेलच्या वतीने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. वेळापत्रकाप्रमाणे पहिल्यांदा नावनोंदणी केली जाईल. त्यानंतर प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर होईल. गुणवत्ता यादीनुसार प्रवेश अर्ज व स्थान निश्चिती करावयाची आहे. हीच प्रक्रिया मेडिकल, फार्मसी महाविद्यालयांसाठी राबवली जाणार आहे. तसेच पारंपरिक बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी. सह बीबीए, बीसीए, बी. ए. बीएड, लॉ., नॅनो सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी, यासह अन्य अभ्यासक्रमाची प्रक्रियाही 15 मेच्या आसपास सुरू होण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी व पालक पुढील प्रवेशाचे नियोजन करीत आहेत. महाविद्यालयांची माहिती घेणे, पूरक कागदपत्रांची जुळवा-जुळव करण्याचे काम पालकांनी सुरू केले आहे. तसेच ज्या विद्यार्थी व पालकांमध्ये कोठे प्रवेश घ्यायचा यासाठी संभ्रम आहे. असे पालक शिक्षणातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेत आहेत. तसेच बारावीचा निकाल हाती आला परंतू प्रतिक्षा आहे ती सीईटी व नीट परीक्षेच्या निकालाची.
- व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे ओढा
स्पर्धेच्या युगात बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेऊन नोकरी किंवा व्यवसाय करण्याला युवकांची पसंती आहे. त्यामुळे बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाकडील ओढा पाहिला तर पारंपरिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे.