पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचे प्रयत्न
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतली ‘एडीबी’ अध्यक्षांची भेट : निधी थांबवण्याची मागणी
वृत्तसंस्था/ मिलान
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत प्रत्येक आघाडीवर पाकिस्तानची कोंडी करण्याचे प्रयत्न करत आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी इटलीतील मिलान येथे आशियाई विकास बँकेचे (एडीबी) अध्यक्ष मसातो कांडा यांची भेट घेत पाकिस्तानची आर्थिक मदत रोखण्याची मागणी केली.
‘एडीबी’ अध्यक्ष मसातो कांडा यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल अर्थ मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर माहिती जारी केली. मसातो यांच्याव्यतिरिक्त अर्थमंत्री सीतारामन यांनी इटलीचे अर्थमंत्री जियानकार्लो जॉर्जेट्टी यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी हीच मागणी पुन्हा करताना दहशतवादाचे संरक्षण आणि प्रोत्साहन देणाऱ्यांना आर्थिक निधी देऊ नये, असे भारताने स्पष्ट केले. भारताने पाकिस्तानला आयएमएफकडून मिळणाऱ्या 7 अब्ज डॉलर्सच्या पॅकेजवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
पाकिस्तानची आर्थिक स्थिती खूपच वाईट असल्यामुळे जगातील अनेक बँकांकडून अब्जावधी डॉलर्सची मदत दिली जाते. हा निधी पुरवण्यामध्ये एडीबी आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांचा मोठा वाटा आहे. या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून विकासाची कामे, हवामान बदलाशी लढा, रस्ते बांधणी, वीज इत्यादी क्षेत्रांसाठी ही मदत दिली जाते. मात्र, पाकिस्तानकडून याचा वापर दहशतवादासाठी केला जात असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. पाकिस्तान विविध बँकांकडून मिळणाऱ्या पैशाचा वापर दहशतवादी कारवायांना चालना देण्यासाठी करतो, असे भारताचे म्हणणे आहे. त्यामुळेच पाकिस्तानला ‘एफएटीएफ’च्या ग्रे यादीमध्ये टाकावे, अशी भारताची मागणी आहे.