‘अटल आसरा’ बनविणार अधिक सोपी, सुटसुटीत
लाभार्थ्यांना मिळणार थेट फायदा,प्रलंबित अर्जांवर त्वरित कार्यवाही
पणजी : ‘अटल आसरा’ च्या लाभार्थ्यांना यापुढे थेट फायदा होईल असे महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री आणि समाजकल्याण मंत्री यांच्या उपस्थितीत मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ‘अटल आसरा’ योजनेबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यावेळी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत लाभार्थ्यांना थेट फायदा व्हावा यादृष्टीने योजनेची अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ बनवणे, विविध कारणांमुळे आतापर्यंत प्रलंबित राहिलेल्या अर्जावर त्वरित कार्यवाही करून त्यांना मंजुरी देणे, यासारख्या निर्णयांचा समावेश आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.
‘अटल आसरा’ योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्यातील प्रत्येक मतदारसंघात या योजनेसंबंधी मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने विशेष शिबिरे आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. त्याद्वारे नागरिकांना स्वत:च्या भागातच मार्गदर्शन आणि साहाय्य मिळणार आहे. तसेच अर्ज प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शकतेने करणे शक्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या निर्णयांची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत व्हावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून समाजातील गरजू घटकांपर्यंत योजना पोहोचवण्यावर भर द्या, असे बजावले आहे.
धनगर समाजाच्या मागण्या सोडविण्याचे आश्वासन
या बैठकीनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी धनगर समाजातील नेत्यांसोबत बैठक घेऊन त्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, समस्या ऐकून घेतल्या. त्याचबरोबर त्यांच्या प्रमुख मागण्यांवर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले. बैठकीत प्रामुख्याने या समाजाच्या वन हक्क दाव्यासंबंधी मागणीवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या घरांशी संबंधित समस्यांही यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या. समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, एजी देविदास पांगम यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.