नजिनकेंडल येथे शॉर्टसर्किटने 5 ट्रॉली गवत जळून खाक
संपर्क साधूनही अग्निशमन दलाकडून प्रतिसाद नाही
खानापूर : तालुक्यातील नजिनकेंडल येथील गवतगंजीला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने पाच ट्रॅक्टर ट्रॉली गवत जळून खाक झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आग लागल्यानंतर खानापूर अग्निशमन दलाला संपर्क साधण्यात आला होता. मात्र अग्निशमन दलाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नसून गावातील नागरिकांनी टँकरने आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, नजीनकोंडल येथील शेतकरी ज्ञानेश्वर नागाप्पा पाटील यांनी आपल्या जनावरांसाठी शेतात पाच ट्रॉली गवत साठवून ठेवले होते. त्यांच्या शेतातून वीजवाहिन्या गेल्या असल्याने दुपारी वाऱ्याच्या झोतामुळे शॉर्टसर्किट होऊन ठिणगी पडल्यामुळे गवतगंजीला आग लागली. आजूबाजूला घरे आणि गवतगंज्या होत्या. नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करून टँकरने पाणी फवारणी करून आग आटोक्यात आणण्यात आला. आणि पुढील अनर्थ टळला आहे. खानापूर अग्निशमन दलाला फोन करून याबाबत माहिती देण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. मात्र अग्निशमन दलाकडून प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आगीत संपूर्ण गवत जळून खाक झाल्याने चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.