आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप उद्यापासून दिल्लीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथील डॉ. कर्णी सिंग रेंजमध्ये पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नेमबाजी पहावयस मिळणार असून 4 ते 13 फेब्रुवारी दरम्यान आशियाई रायफल/पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन येथे करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी विविध सहभागी देशांचे पथक आधीच दाखल झाले आहे. रायफल आणि पिस्तूल नेमबाजांसाठीच्या या प्रमुख खंडीय स्पर्धेचे वेळापत्रक 10 दिवसांचे असून, 13 फेब्रुवारी हा समारोपाचा दिवस असेल. यजमान भारतासह 20 देशांतील एकूण 311 खेळाडू कनिष्ठ आणि वरिष्ठ गटांमध्ये स्पर्धा करतील, जिथे 30 पदकांचे संच जिंकण्याची संधी आहे. या सोबतच युवा स्पर्धाही घेतल्या जातील. भारताने 117 खेळाडूंचा सर्वात मोठा संघ मैदानात उतरवला आहे, तर कझाकस्तानने 35 खेळाडूंचा दुसरा सर्वात मोठा संघ पाठवला आहे. विभागीय शक्ती असलेले दक्षिण कोरिया, इराण आणि जपान यांनीही मजबूत संघ पाठवले आहेत आणि चायनीज तैपेई, व्हिएतनाम आणि हाँगकाँगच्या नेमबाजांकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
या स्पर्धेपूर्वी बोलताना एनआरएआयचे सरचिटणीस पवनकुमार सिंह यांनी स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित केले आणि सांगितले की, हे वर्ष भारतीय नेमबाजीसाठी आणि आशियाई नेमबाजांसाठीही खूप महत्त्वाचे आहे, कारण वर्षाच्या उत्तरार्धात आशियाई क्रीडा स्पर्धा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धा अशा दोन मोठ्या स्पर्धा होणार आहेत. यापैकी जागतिक स्पर्धेत लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पहिले कोटा स्थान मिळेल. त्यामुळे, ही स्पर्धा खंडातील नेमबाजांसाठी आंतरराष्ट्रीय हंगामाची सुरुवात असेल आणि त्यांना स्वताचे मूल्यांकन करण्याची संधी मिळेल, भारतीय क्रीडा प्राधिकरण, क्रीडा मंत्रालय आणि भारत सरकार व त्यांच्या संस्थांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे, एनआरएआयने जागतिक दर्जाचा आंतरराष्ट्रीय क्रीडा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. बुधवारी, स्पर्धेच्या पहिल्या दिवशी चार महत्त्वाच्या अंतिम फेऱ्या होणार आहेत. पुरुष आणि महिलांची 10 मीटर एअर पिस्तूल आणि कनिष्ठ व युवा पुरुषांची 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धा होणार आहे.