Ashadhi Wari 2025: दिंडी चालली हो.. दिंडी चालली चालली, ग्रामीण भागांत वारीचे वेध
परिसरातील शंभर-सव्वाशे महिला व पुरुषांचे गट सोहळ्यामध्ये सहभागी होतात.
By : गजानन लव्हटे
सांगरूळ : आषाढीच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागात दिंडी सोहळ्याच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे . वाहनांची तयारी, पिण्याचे पाणी, जेवणाचे साहित्य जमा करण्यात दिंडीतील वारकरी व्यस्त असल्याचे दिसत आहे. बुधवार दि. १९ जून रोजी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आषाढी वारीसाठी आळंदीतून पंढरपूरला प्रस्थान करणार आहेत.
या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागातील दिंड्या मंगळवार दि. १८ जून रोजी आळंदीकडे प्रस्थान करणार आहेत. करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांगावातील दिंड्या दरवर्षी आळंदी ते पंढरपूर दिंडी सोहळ्यात सहभागी होतात. ह. भ . प. वैकुंठवासी तात्यासाहेब वासकर महाराज यांना मानणारा संप्रदाय या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. परिसरातील शंभर-सव्वाशे महिला व पुरुषांचे गट या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात.
जून महिन्याची सुरुवात झाल्यानंतर या सोहळ्याच्या तयारीची लगबग सुरू होते. वर्षभर कामात व्यस्त असणारे कार्यकर्ते, वारकरी एकत्र येतात आणि नियोजन करत तयारीची लगबग सुरू होते. पंधरा ते वीस दिवस दिंडी सोहळा असतो. या कालावधीत पुरेल एवढे जेवणाचे साहित्य, पिण्यासाठी व जेवणासाठी ग्रुपमधील लोकांना पुरेशी पाणी साठवण्याची टाकी, इंधन, जेवणासाठी आवश्यक भांडी इत्यादी साहित्याची जमवाजमव केली जाते.
प्रवासासाठी ट्रक किंवा ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर केला जातो. या लोकांना बसण्यासाठी ट्रकमध्ये बैठक व्यवस्था करणे. ऊन-वारा-पाऊस यांपासून संरक्षणासाठी छताची व्यवस्था करणे. तसेच विसाव्याच्या ठिकाणी व मुक्कामाच्या ठिकाणी निवाऱ्यासाठी पाल उभा करणे यासाठीचे लागणारे साहित्य जुळवाजुळव करून ट्रक अगर ट्रॉलीत व्यवस्थित भरणे या कामांना वेग आला आहे.
अनेक भाविक धान्य व आर्थिक रूपाने मदत करतात. सध्याच्या महागाईमुळे आर्थिक गणित जमवणे तारेवरची कसरत आहे. यासाठी सहभागी होणारे ग्रुपमधील सदस्य वर्गणीच्या रूपाने खर्चाची रक्कम जमवत आहेत. एकंदरीत सध्याच्या आधुनिकतेच्या युगातही मोठ्या भक्तीने हा पायी पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वजण मनापासून प्रयत्नशील राहतात.