अधिकाऱ्यांची पाठ फिरताच फेरीवाल्यांनी मांडले ठाण
कॅन्टोन्मेंटमधील अतिक्रमण हटाव मोहीम औटघटकेचीच
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डने आठ ते दहा दिवसांपूर्वी पदपथावरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविले होते. परंतु अधिकाऱ्यांची पाठ फिरताच पदपथावर पुन्हा फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. यामुळे अतिक्रमणाविरोधातील मोहीम काही दिवसांपुरतीच होती का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महानगरपालिकेपाठोपाठ कॅन्टोन्मेंटनेही अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू केली. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील फेरीवाल्यांना हटविण्यात आले. त्याचबरोबर शहराच्या इतर भागातही कॅन्टोन्मेंटने कारवाईला सुरुवात केली होती. स्टॉल हटविण्यात येत असल्याची धास्ती घेऊन जिमखाना रोड व त्यापाठोपाठ रेल्वे स्टेशनसमोरील पदपथावरील स्टॉल हटविण्यात आले. यामुळे पहिल्यांदाच हा रस्ता मोकळा झाल्याचे दिसून आले.
अतिक्रमण हटाव मोहीम थांबताच आठवडाभरातच पुन्हा फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. काही ठिकाणी स्टॉल पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाही का, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अतिक्रमण हटाव मोहीम ही कायमस्वरूपी ठेवून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.
कॅन्टोन्मेंटच्या खुल्या जागांवर रस्त्याशेजारी अनेक ठिकाणी अतिक्रमण आहे. मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्थानक या परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे रस्ते मोकळे असणे आवश्यक आहे. युनियन जिमखाना रोड येथे बेळगाव तालुक्यासह चंदगड व कोकणात जाणाऱ्या नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे फेरीवाल्यांवर वेळीच कारवाई होणे आवश्यक