Sthanik Swarajya Sanstha 2025: निवडणुकांची लगबग सुरु, शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकींना वेग
शिवसेनेमुळे मोठे होवून, मलई खालेले सर्वजण गेले आहेत
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घ्यावा, असा आदेश राज्य सरकारला दिला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना सुरुवात झाली आहे. राज्यातील सर्व मतदार संघात आजी, माजी नगरसेवक, इच्छुकांनी भाऊगर्दी करत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातही राजकीय हालचालींना वेग आला आहे.
कोल्हापुरात शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने ही बैठक घेतली असून शिवसेना ठाकरे पक्ष स्थानिक संस्थांच्या निवडणूका लढवण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी माध्यमांशी संवाद साधाला.
ते म्हणाले, आम्ही चाचपणी करुनच निर्णय घेणार आहोत. कारण जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सत्ता आणायची आहे. निवडणूका स्वतंत्र की, आघाडी म्हणून लढवायच्या याचा निर्णय पक्षप्रमुख घेतील. स्वतंत्र लढायचे असल्यास, ज्या प्रभागात उभे राहणार आहे तिथे स्वत:ची ताकद दाखवून उभे राहणे आवश्यक आहे. चांगल काम असलेल्या भागात न्याय मिळावा अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. पक्षातील काही नाराज पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी आलो आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निर्णय आमच्या बाजूने लागेल असा विश्वास आहे. शिवसेनेमुळे मोठे होवून, मलई खालेले सर्वजण गेले आहेत. परंतु जमीनीवरील शिवसैनिक जागेवर आहे. शिवसेना ठाकरे पक्षात संघटनात्मक बदल होणार आहे. त्यासाठी चाचपणी सुरू आहे. पक्षप्रमुखांनी संघटनात्मक चर्चा करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलवले होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटू नये, यावर ते म्हणाले, शरद पवार यांच्या वक्तव्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत उत्तर देतील.
के.पी. पाटलांचा काढला चिमटा
के.पी.पाटलांना उमेदवारी दिली. परंतु त्यांनी काय केले. ते निघून गेले. त्यामुळे के.पी.पाटलांच नेमकं काय आहे ते समजत नाही. त्याचं जे काही सुरु आहे ते पक्षप्रमुखांच्या कानावर घालणार आहे. त्यानंतर के.पी.पाटलांचा निर्णय होईल, अस म्हणत त्यांनी केपींचा चिमटा घेतला आहे.