विषारी दारुबळीप्रकरणी अटकसत्र
वृत्तसंस्था / चेन्नई
तामिळनाडूत दोन दिवसांपूर्वी घडलेल्या विषारी दारुबळी प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. या दारुकांडात 53 जणांचा मृत्यू झाला आहे. या राज्यातील कल्लाकुरीची येथे हे कांड घडले असून 193 जणांनी विषारी दारुचे सेवन केले होते असे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यापैकी 53 जणांचा मृत्यू झाला. आणखी 140 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये औषधोपचार होत आहेत. त्यांच्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
कल्लाकुरीचीचे जिल्हाधिकारी एम. एस. प्रशांत यांनी शनिवारी या घटनेविषयी अधिक माहिती दिली. दारुकांडाची कसून चौकशी होत असून दोषींना सोडले जाणार नाही. उपचारांचा सर्व खर्च सरकार करणार आहे. सर्व सरकारी रुग्णलयांना उपचारांसाठी आवश्यक ती साधने पुरविण्यात आली आहेत. औषधांचा तुटवडा नाही. अनेकांची प्रकृती झपाट्याने सुधारत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप, अद्रमुकचे टीकास्त्र
या दारुकांडाला तामिळनाडू सरकार उत्तरदायी आहे. राज्यात अवैध दारु गाळण्याच्या धंद्याला या सरकारच्या काळात बरकत आली आहे. दारु माफियांचे संबंध खोलवर आहेत. राज्य सरकारच्या अनास्थेपोटी इतक्या लोकांचे बळी गेले आहेत. राज्य सरकार या घटनेतील दोषींना संरक्षण देत आहे. त्यामुळे कारवाईला विलंब लागत आहे. या घटनेचे उत्तरदायित्व स्वीकारुन तामिळनाडूचे दारुबंदी आणि उत्पादन शुल्क मंत्री एस. मुथूस्वामी यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी नवी दिल्ली येथे केली आहे. तामिळनाडूतील स्थानिक पक्ष अण्णाद्रमुकनेही हे बळी राज्यसरकारच्या कार्यपद्धतीमुळे पडले असून राज्यात भ्रष्टाचार वाढल्याची टीका केली आहे.