For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अर्जुनाने युद्ध न टाळण्यासाठी केलेला युक्तिवाद

06:03 AM Sep 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
अर्जुनाने युद्ध न टाळण्यासाठी केलेला युक्तिवाद
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

लढाईला सुरवात करण्यापूर्वी अर्जुनाला असे वाटले की, ज्यांच्याशी आपल्याला लढायचे आहे त्या सर्वांना एकदा पाहून घ्यावे. त्याने तशी इच्छा व्यक्त करताच श्रीकृष्णाने त्याचा रथ दोन्ही सैन्यांच्यामध्ये नेऊन उभा केला. तेथे उभे असलेल्या गुरु, नातेवाईक आणि मित्र ह्यांना पाहून अर्जुन त्यांच्या मोहात पडला आणि त्याच्या मनात करुणा उत्पन्न झाली. त्यामुळे त्याच्या अंगी असलेले धैर्य खचले. तो खेदयुक्त होऊन कृष्णाला म्हणाला, या नातलगांशी युद्ध करायच्या विचाराने मला कसेसेच होत आहे. ह्या सगळ्यांना मारून राज्य मिळवायचे ही गोष्ट मला पटत नाही. बरे आपले हित कशात आहे हे लोभाने ह्या बुद्धीभ्रष्ट झालेल्या कौरवांना समजले नसेल पण आम्ही तरी नीट विचार करायला नको का?

लोभाने नासली बुद्धि त्यामुळे हे न पाहती । मित्र-द्रोही कसे पाप काय दोष कुल-क्षयी ।।38।। परी हे पाप टाळावे आम्हा का समजू नये । कुल-क्षयी महा-दोष कृष्णा उघड पाहता ।।39।।

Advertisement

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अर्जुनाने श्रीकृष्णाला असे सांगितले की, हे कौरव अभिमानाच्या मस्तीने बहकून जरी लढण्याकरता आले असले तरी आम्ही आपले हित कशात आहे हे पाहिले पाहिजे. रस्त्याने चालले असता अकस्मात सिंह आडवा आला तर त्याला चुकवून जाण्यातच आपले हित असते. देवा, ऐका. हे पाप किती भयंकर आहे हे मी तुम्हाला सांगतो. असे म्हणून पुढील श्लोकात त्याने कुलक्षय, धर्मनाश, अधर्म, वर्णसंकर ह्याबद्दल सविस्तर सांगितले. तो म्हणतो,

कुल-क्षये लया जाती कुलधर्म सनातन । धर्म-नाशे कुळी सर्व अधर्म पसरे मग ।। 40।। अधर्म माजतो तेंव्हा भ्रष्ट होती कुल-स्त्रिया । स्त्रिया बिघडता कृष्णा घडतो वर्ण-संकर ।। 41।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अर्जुनाने श्रीकृष्णाला असे सांगितले की, ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले असता अग्नि उत्पन्न होतो आणि तो भडकला म्हणजे सर्व लाकडांना जाळून टाकतो, त्याप्रमाणे कुळामध्ये मत्सराने एकमेकांनी एकमेकांचा वध केला तर त्या महाभयंकर दोषाने कुळाचा नाश होतो. म्हणून या पापाने वंशपरंपरागत चालत आलेल्या धर्माचा लोप होईल आणि मग कुळामध्ये अधर्म माजेल. सर्वत्र फक्त पापाचरण होत राहील. ज्यावेळी इंद्रिये व मन यांच्यावरील ताबा सूटतो, त्यावेळी इंद्रिये स्वैर होतात आणि मग सहजच कुलीन स्त्रियांच्या हातून व्यभिचार घडतो. वर्णसंकर होऊन जातिधर्म मुळापासून उखडले जातात. वर्णसंकर झाल्यामुळे पितरांचा अध:पात होऊन त्यांना नरकात रहावे लागते.

संकरे नरका जाय कुलघ्नांसह ते कुळ । पितरांचा अध:पात होतसे श्राद्ध लोपुनी ।। 42 ।। ह्या दोषांनी कुलघ्नांच्या होऊनी वर्ण-संकर । जातींचे बुडती धर्म कुळाचे हि सनातन ।। 43।। ज्यांनी बुडविले धर्म कुळाचे त्यांस निश्चित । नरकी राहणे लागे आलो ऐकत हे असे ।। 44 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अर्जुनाने श्रीकृष्णाला असे सांगितले की, पितरांचा अध:पात होऊन त्या संपूर्ण कुळाला व कुळघातक्याला नरकात जावे लागते. ह्याप्रमाणे वंशात वाढलेली प्रजा अधोगतीला जाते. जिथे रोज करायची धार्मिक कृत्येसुद्धा बंद पडतात तिथे कोण कोणाला तिलोदक देणार? असे झाले की, त्यांचे स्वर्गातील पूर्वज परत येणार. ते स्वर्गात राहू शकत नाहीत म्हणून ते आपल्या कुळापाशी नरकात येतात. अनेक दोषांमुळे त्या सर्व कुळाला भयंकर नरक भोगावा लागतो. त्यांची कल्पांतीही सुटका होत नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :

.