कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अर्जुना, तू स्वकीयांच्या मृत्यूबद्दल शोक करू नकोस

06:57 AM Oct 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

भगवंत म्हणाले, अर्जुना, तू स्वत:ला कर्ता समजतो आहेस आणि समोर दिसणारे जग तुला खरे वाटत आहे म्हणून तू तुझ्या नातेवाईकांचा वध करायला तयार नाहीस. तुला मोहाने ग्रासले आहे. खरे तर हे जग विनाशी आहे तसेच समोर दिसणाऱ्या व्यक्ती कधी ना कधी मरण पावणार आहेत. त्यांचा मृत्यू केव्हा होणार आहे, कोण करणार आहे हे ठरवणारी शक्ती वेगळी असून ती मात्र अविनाशी आहे. प्रत्येकात त्या अविनाशी शक्तीचा अंश असून तोही त्या शक्तीप्रमाणे अमर आहे हे लक्षात घे. तुझे नातेवाईक हे अत्याचारी असून त्यांना त्यांच्या दुष्कृत्यांची शिक्षा मिळणे आवश्यक आहे आणि तू क्षत्रिय असल्याने अन्याय करणाऱ्यांना शासन करणे हे तुझे कर्तव्य आहे. म्हणून जगाचे संचालन करणाऱ्या शक्तीने त्यांचा वध करण्यासाठी तुझी नियुक्ती केलेली आहे. तुझ्या हातून तुझ्या नातेवाईकांचा जरी वध झाला असे दिसले तरी ती तुझी इच्छा नसून जगाचे संचालन करणाऱ्या शक्तीची इच्छा आहे हे लक्षात घे.

Advertisement

एखादा मनुष्य मेला की, त्याचे आप्त स्वकीय दु:खी होतात कारण शरीर नष्ट झाले की त्या माणसाचे अस्तित्व संपले असे ते मानतात. दिसताना हे बरोबर आहे असे वाटत असले तरी सध्याचे शरीर हे त्याचे खरे अस्तित्व नसून ती त्याची तात्पुरती ओळख असते. त्याची खरी ओळख आत्मा अशी असते आणि तो कधीच मरत नाही. हे जो लक्षात घेतो त्याला स्वकीयाच्या मृत्यूने दु:ख होत नाही. अर्थात हे लिहायला सोपे आहे पण स्वकीयांच्या मृत्यचा प्रसंग ओढवला की, अतोनात दु:ख होते कारण आपण अर्जुनाप्रमाणे मायेने ग्रासले गेलेलो आहोत. स्वकीयांच्या मृत्यूचे दु:ख तर असतेच पण त्यांच्या नसण्याने आपले पुढे कसे होणार ही चिंताही आपल्याला भेडसावत असते. वास्तविक पाहता आपण चिंता करून काहीही उपयोग नसतो कारण आपल्या प्रारब्धानुसार घटना घडत असतात आणि बिकट परिस्थितीत परमात्मा आपल्याला मदत करण्यास तयार असतो. ओढवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यास तो आपल्याला आवश्यक ते बळ देत असतो आणि परिस्थिती सुसह्य कशी होईल ह्याची काळजी घेतो. हे सर्व ज्याच्या लक्षात येते तो आलेल्या संकटातून लवकर सावरतो. ह्यासाठीच गीतेचा अभ्यास करायचा आणि ती जीवनात अमलात आणण्याचा प्रयत्न करायचा.

पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, आत्म्याचे शरीर बदलणे हे अगदी स्वाभाविक आहे कारण हे शरीर विनाशी असल्याने कालांतराने ते थकते, वृद्ध होते, त्यामुळे काही करण्याच्या दृष्टीने हळूहळू कमकुवत होत जाते. म्हणून त्यातील आत्म्याला हे जगत चालवणारी शक्ती दुसरे शरीर प्रदान करते. हे म्हणजे एक वस्त्र बदलून दुसरे नेसल्यासारखेच आहे. पुढील प्रसिद्ध श्लोकात भगवंत म्हणतात, वासंसि जीर्णानि यथा विहाय....

सांडूनिया जर्जर जीर्ण वस्त्रs । मनुष्य घेतो दुसरी नविन ।। तशीचि टाकूनि जुनी शरिरे । आत्मा हि घेतो दुसरी निराळी ।। 22 ।।

शरीराबद्दल सांगून झाल्यावर आत्मा अविनाशी कसा आहे हे सांगताना भगवंत म्हणतात,

शस्त्रs न चिरिती ह्यास । ह्यास अग्नि न जाळितो ।। पाणी न भिजवी ह्यास । ह्यास वारा न वाळवी ।। 23 ।। चिरवे जाळवे ना हा । भिजवे वाळवे हि ना ।। स्थिर निश्चळ हा नित्य । सर्वव्यापी सनातन ।। 24 ।।

श्लोकांच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतानी अर्जुनाला असे सांगितले की, आत्मा जन्म-मरणरहित असल्याने कायम टिकणारा असून अत्यंत शुद्ध आहे. ह्याला कसल्याही इच्छा आकांक्षा नसतात. हा प्रलयकाळच्या पाण्यानेही बुडत नाही किंवा अग्नीने जळत नाही. तसेच वायूमध्ये देखील याला कोरडे करण्याची शक्ती नाही. हा नित्य, स्थिर व शाश्वत असून स्वयंप्रकाशित परिपूर्ण आहे. त्याने सर्व देह व्यापलेला असतो.

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article