शहराला जलवाहिन्या गळतीचे ग्रहण
जलवाहिन्या दुरुस्तीकडे कंपनीचेच दुर्लक्ष
बेळगाव : शहरात आठ दिवसाआड पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असली तरी, दुसरीकडे जलवाहिन्यांना गळती लागून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. यामुळे जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खडेबाजार, गणपत गल्ली कॉर्नरवर जलवाहिनीला गळती लागून पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. शहरात दररोज कोठे ना कोठे जलवाहिनीच्या नादुरुस्तीमुळे पाणी वाया जाऊ लागले आहे. त्यामुळे शहरातील जलवाहिन्यांना पाणी गळतीचे ग्रहण लागले आहे. ऐन पाणी टंचाईच्या दिवसांत पाणी वाया जात असल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे. एलअॅण्डटी कंपनीकडून पाणी वाचवा, असा संदेश दिला जात आहे. मात्र, नादुरुस्त जलवाहिन्यांच्या दुरुस्तीकडे कंपनीचेच दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय दररोज सुरू आहे. याबाबत एलअॅण्डटी कंपनी गांभीर्य घेणार का? असा प्रश्नही पडू लागला आहे. खडेबाजार, गणपत गल्ली कॉर्नरवर नादुरुस्त जलवाहिनीतून पाणी वाया जावू लागले आहे. तात्पुरती दुरुस्ती करून एलअॅण्डटी कंपनी वेळ मारून नेत आहे. मात्र, दोन दिवस गेल्यानंतर परिस्थिती जैसे थे बनू लागली आहे. त्यामुळे कायमस्वरुपी दुरुस्ती करून पाणी गळती थांबवावी, अशी मागणी होत आहे.