359 सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती निश्चित
हिवाळी अधिवेशनादरम्यान देणार नियुक्तीपत्र
बेळगाव : महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरून मोठा वाद झाला होता. त्यावर तोडगा काढण्यात आला असून मनपातील 359 सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी यादी तयार करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामगारांना नियुक्तीचा आदेश देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक बेकायदेशीर झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. नेमणूक करताना त्यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप महानगरपालिकेतील विरोधी गटाच्या नगरसेवकांकडून करण्यात आला होता. सर्वसाधारण सभेमध्ये यावरून मोठा गोंधळ उडाला. सत्ताधारी गटाला कोंडीत पकडण्यात आले होते. मात्र, घाईगडबडीत ती सर्वसाधारण सभा गुंडाळण्यात आली होती.
सफाई कर्मचाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला होता. काही सफाई कर्मचाऱ्यांचा नऊ महिने पगार झाला नाही तर काहींचा सहा महिने पगार झाला नव्हता. त्यामुळे त्यांनीही सदाशिवनगर येथील वाहन गोडावूनसमोर आंदोलन छेडले होते. सफाई कर्मचाऱ्यांची हलाखीची परिस्थिती पाहून आमदार राजू सेठ यांनी तातडीने त्यांना वेतन द्यावे, यासाठी प्रयत्न करा, असे आयुक्तांना सांगितले होते. त्यानंतर राजू सेठ यांनीच राज्य नगरपालिका संचालनालयाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर त्यांना रितसर नियुक्ती झाल्याचे सांगण्यात आले. आयुक्त अशोक दुडगुंटी यांनीही त्यासाठी प्रयत्न केले. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. कामगार खात्याकडे नियुक्तीबाबत निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 204 व 155 अशाप्रकारे एकूण 359 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची यादी तयार केली आहे. हिवाळी अधिवेशनावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.