फळबागेसह बांबू लागवडीसाठी अर्ज करा
चिपळूण :
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (नरेगा) योजनेंतर्गत कृषी विभागामार्फत आंबा, काजू नारळ, सुपारी, फणस, कोकम, चिकू इत्यादी फळपिके तसेच बांबू लागवडीसाठी १०० टक्के अनुदान उपलब्ध आहे. या योजनेंतर्गत अर्ज भरण्याचे आवाहन, तालुका कृषी विभागाने केले आहे.
याबाबत कृषी विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोकण विभागात रत्नागिरी जिल्हातील हवामान फळबाग व बांबू लागवडीसाठी चांगले आहे. शेतीमधून शाश्वत स्वरुपाचे उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे वळणे आवश्यक आहे. जून महिना फळबाग लागवडीसाठी योग्य कालावधी आहे. जूनमध्ये लागवड केलेल्या कलमांची वाढ जोमात होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जून महिन्यामध्ये फळपिक व बांबूची लागवड करण्याचा प्रयत्न करावा, असे सूचित करण्यात आले आहे.
नरेगा अंतर्गत शेतकरी बांधवांना ५ गुंठे ते २ हेक्टर क्षेत्रापर्यंत फळबाग लागवड करता येते. यामध्ये प्रथम वर्षी ६० टक्के, द्वितीय व तृतीय वर्षी प्रत्येकी २० टक्के याप्रमाणे अनुदान दिले जाते. या योजनेत अल्पभूधारक शेतकरी म्हणजे २ हेक्टर व त्यापेक्षा कमी जमीनधारणा असलेले शेतकरी लाभ घेऊ शकतात. अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतऱ्यांना जमीनधारणेची अट नाही. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांकडे नरेगाचे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
फळबाग व बांबू लागवडीसाठी लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज व त्यासोबत ७/१२ उतारा, ८ अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, जॉब कार्ड, संमतीपत्र, ग्रामसभा ठराव इत्यादी कागदपत्रे ग्रामस्तरीय सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावित. तसेच अधिक माहितीसाठी सहाय्यक कृषी आधिकारी किंवा तालुका कृषी आधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.